नवी दिल्ली : भारतीय क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. जपानची राजधानी टोकियोमध्ये पुढील वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. या ऑलिंम्पिकसाठीच्या पात्रता स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष हॉकी संघाने बाजी मारली आहे. भारताचा महिला आणि पुरुष संघ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहेत. भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर घेण्यात आलेल्या दोन टप्प्यांच्या ऑलिम्पिक पात्रता सामन्यांमध्ये भारताच्या महिला संघाने अमेरिका तर पुरुष संघाने रशियावर मात करत ऑलिम्पिक स्पर्धेत एन्ट्री केली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय महिला हॉकी संघाचा अमेरिकेसोबत झालेला भारताचा सामना रंजक ठरला. पहिल्या हाफमध्ये अमेरिकेने तब्बल ४ गोल केले होते. भारताचं खातंही उघडलं नव्हतं. शुक्रवारी भारतानं अमेरिकेला ५-१ अशी दणदणीत मात दिली. मात्र पहिल्याच हाफमध्ये अमेरिकी संघाने गोलसंख्या समान केली होती. मात्र ४९व्या मिनिटाला कर्णधार रानी रामपालच्या एका सुंदर पासवर भारताने गोल ठोकला आणि दोन्ही सामन्यांच्या अॅग्रिगेट स्कोअरमध्ये भारतानं ६-५ अशी बाजी मारली आणि ऑलिम्पिकमधलं आपलं स्थान पक्कं केलं.


  


पुरूषांच्या भारतीय संघानं रशियाचा ७-१ असा पराभव केला. शुक्रवारच्या सामन्यातही भारतानं रशियाला ४-२ अशी धूळ चारली होती. दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून टीम इंडिया ११-३ अशा एकत्रित गोलसंख्येच्या बळावर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.