जयपूर : अजिंक्य रहाणेने केलेल्या शतकानंतरही दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये राजस्थानचा पराभव झाला. ऋषभ पंतने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे अजिंक्य रहाणेचं शतक वाया गेलं. या मॅचमध्ये दिल्लीने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. राजस्थानने २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून १९१ रन केले. रहाणेने ६३ बॉलमध्ये १०५ रन केल्या. यामध्ये ११ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानने ठेवलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. शिखर धवनने २७ बॉलमध्ये ५४ रन केले. तर पृथ्वी शॉने ३९ बॉलमध्ये ४२ रनची खेळी केली. धवन आणि पृथ्वी शॉ या ओपनरनी दिल्लीला ७ ओव्हरमध्येच ७२ रनची पार्टनरशीप करून दिली. यानंतर दिल्लीने २ विकेट झटपट गमावल्या. मग ऋषभ पंतने ३६ बॉलमध्ये ७८ रन केले. यामध्ये ६ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता.


अजिंक्य रहाणेचं आयपीएलमधलं हे दुसरं शतक होतं. याआधी रहाणेने १५ एप्रिल २०१२ ला बंगळुरूविरुद्ध आयपीएलमध्ये आपले पहिले वहिले शतक लगावले होते. रहाणेने केलेल्या या २ शतकांमुळे तो दिग्गजांच्या यादीत पोहोचला आहे. आयपीएलमध्ये २ शतकं लगावणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत रहाणे पोहोचला आहे.


आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराटने आतापर्यंत आयपीएलमध्ये ५ शतकं ठोकली आहेत. तर मुरली विजय, वीरेंद्र सेहवाग आणि संजू सॅमसन यांनी देखील २ शतक लगावले आहेत. रहाणेने केलेल्या २ शतकांमुळे त्याला या यादीत स्थान मिळाले आहे.