मुंबई : कायरन पोलार्डच्या तडाखेबाज खेळीमुळे मुंबईने पंजाबचा ३ विकेटने पराभव केला आहे. कायरन पोलार्डने ३१ बॉलमध्ये ८३ रनची खेळी केली. यामध्ये १० सिक्स आणि ३ फोरचा समावेश होता. मुंबईला शेवटच्या ओव्हरमध्ये १५ रनची गरज होती. तेव्हा पंजाबचा कर्णधार अश्विनने अंकित राजपूतकडे बॉल दिला. राजपूतने पहिलाच बॉल नो बॉल टाकला. या बॉलवर पोलार्डने सिक्स मारली. यानंतरच्या फ्री हिटवर पोलार्डने फोर मारली. शेवटच्या ओव्हरच्या एकाच बॉलमध्ये मुंबईला ११ रन मिळाल्यामुळे विजय सोपा वाटत होता. पण राजपूतने पोलार्डला माघारी पाठवून मुंबईचं टेन्शन वाढवलं. शेवटच्या बॉलवर मुंबईला विजयासाठी २ रनची गरज होती, तेव्हा अल्झारी जोसेफने २ रन करून मुंबईला जिंकवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबने ठेवलेल्या १९८ रनचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. २८ रनवर मुंबईला पहिला धक्का लागला. यानंतर मुंबईच्या वारंवार विकेट पडतच होत्या, पण कर्णधार पोलार्ड हा एकटा किल्ला लढवत होता. पंजाबच्या मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर अंकित राजपूत, रवीचंद्रन अश्विन आणि सॅम कुरनला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.


या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर पंजाबने मुंबईपुढे मोठ्या धावसंख्येचं आव्हान ठेवलं. पंजाबने २० ओव्हरमध्ये १९७/४ एवढा स्कोअर केला. केएल राहुलने ६४ बॉलमध्ये नाबाद १०० रनची खेळी केली. पंजाबच्या दोन्ही ओपनरनी मुंबईच्या बॉलरचा अक्षरश: धुव्वा उडवला. राहुल आणि गेल यांच्यामध्ये ११६ रनची पार्टनरशीप झाली. क्रिस गेल ३६ बॉलमध्ये ६३ रन करून आऊट झाला.


क्रिस गेल आऊट झाल्यानंतर मुंबईच्या टीमने मॅचमध्ये पुनरागमन केलं. पण १९व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने २५ रन दिले. तर २०व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने १३ रन दिले. शेवटच्या ३ ओव्हरमध्ये पंजाबने ५४ रन काढले.


मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक २ विकेट घेतल्या, पण त्याने ४ ओव्हरमध्ये तब्बल ५७ रन दिले. बेहरेनडॉर्फ आणि बुमराहने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. दुखापतीमुळे या मॅचमध्ये कर्णधार रोहित शर्मा खेळत नाहीये. रोहित शर्माऐवजी मुंबईने सिद्धेश लाडला संधी दिली आहे. रोहितऐवजी पोलार्डकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं.


पंजाबविरुद्धच्या या विजयामुळे मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे. तर पंजाबची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईने आत्तापर्यंत खेळलेल्या ६ मॅचपैकी ४ मॅचमध्ये विजय मिळवला तर २ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.