IPL 2024 : आयपीएलला सुरुवात झाल्यापासून काही खेळाडूंची नावं विशेष चर्चेत राहिल्याचं पाहायला मिळालं. एकिकडे काही संघांच्या गुणांची गोळाबेरीज सुरु असतानाच दुसरीकडे याच चर्चेचा विषय ठरणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीवरही (Cricket) क्रिकेटमधील अनुभवी खेळाडू आणि जाणकारांनी लक्ष देण्यास सुरुवात केली. यातलंच एक कमालीचं नजरा वळवणारं नाव म्हणजे मयांक यादव (Mayank Yadav). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

21 वर्षीय मयांक यादव, सध्या लखनऊ सुपर जायंट्स संघातून वेगवान गोलंदाज म्हणून सर्वांसमोर आला असून, त्याच्या गोलंदाजीमुळं खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेट विश्वास एक वादळ आलं आहे. हा तोच मयांक यादव आहे, ज्यानं भारतीय नौदलातील नोकरी नाकारत क्रिकेट जगतामध्ये स्वप्न साकारण्याची वाट निवडली. या निर्णयासाठी त्याला काही ओळींनी प्रोत्साहन दिलं, जे प्रथमदर्शी रतन टाटा यांचे होते असं सांगण्यात आलं होतं. पण, नंतर मात्र ते शब्द रतन टाटा यांचे नाहीत हेच स्पष्ट झालं. 


काय होते ते शब्द? 


नौदलातील नोकरी (Job News) नाकारली म्हणून मयांकच्या प्रशिक्षकांनी त्याच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. याचवेळी दुखापतीमुळं आपल्या क्रिकेट कारकिर्दीवर याचा परिणाम होऊ शकतो अशीही भीती त्याच्या मनात होती. कोविड 19 च्या काळात त्याच्या या चिंतेत आणखी भर पडली. यावेळी अशांत गोष्टींना काहीसं स्थैर्य देण्याच्या प्रयत्नांत मयांकनं भगवद् गीता वाचण्यास सुरुवात केली आणि त्याचवेळी सोशल मीडियावरील काही ओळींनी त्यांच्या मनात कायमचं घर केलं. 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ओळी कथित स्वरुपात रतन टाटा यांच्या असल्याचं सांगण्यात आलं होतं. याचविषयी सांगताना मयांक म्हणाला, 'मी कुठेतरी वाचलेलं की, एकदा रतन टाटा म्हणाले होते, योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही. तर, मी आधी निर्णय घेतो आणि नंतर ते योग्य ठरवतो. त्यांचं हे म्हणणं मला पटलं.' 


हेसुद्धा वाचा : Monsoon 2024 : मान्सून नेमका कधी येणार? शेतकऱ्यांसह संपूर्ण देशाला दिलासा!​


रतन टाटा यांच्या या कथित ओळींविषयी Google वर शोधलं असता खुद्द टाटा यांनीच आपण असं काही म्हणालेलो नसून, हे शब्द सोशल मीडियाचेच असल्याचं स्पष्ट केल्याचं लक्षात आणून दिलं. त्यामुळं हे शब्दच मुळात रतन टाटा यांचे नव्हते, तरीही त्यापुढे फक्त त्यांचं नाव लागलं आणि ते शब्दही इतरांप्रमाणं मयांकवरही प्रभाव पाडून गेले ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. 


 IPL 2024 मधील सर्वात वेगवान चेंडू टाकत मयांकनं अनेकांच्याच नजरा वळवल्या. आयपीएलमध्ये पंजाबच्या सामन्याविरोधात खेळताना त्यानं केलेली गोलंदाजी आणि ताशी 157 सरासरीच्या वेगानं टाकलेला चेंडू त्याला प्रकाशझोतात आणून गेला.