IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challenders Bangluru) विजयाची हॅटट्रीक केली आहे. शनिवारी म्हणजे 4 मे रोजी एम चिन्नास्वामी स्टेडिअवर खेळल्या गेलेल्या गुजरात टायटन्सला बंगळुरुने चार विकेटने हरवलं. या विजयाबरोबरच आरसीबीने (RCB) आपलं आव्हान अजूनही जिवंत ठेवलं आहे. तसं पाहिलं तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं प्ले ऑफमध्ये पोहोचणं तसं अवघडचं आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांपैकी 7 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. तर चार सामन्यात विजय मिळला असून त्यांच्या खात्यात 8 पॉईंट्स आहेत. बंगळुरुचा नेट रेटही मायनसमध्ये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयल चॅलेंजर्सचे अद्याप तीन सामने बाकी आहेत. पुढचे तीनही सामने जिंकले तरी बंगळुरुच्या खात्यात 14 पॉईंट जमा होतील. पुढचे तीन सामने बंगळुरुला पंजाब किंग्स (PBKS), दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (CSK) खेळायचे आहेत. 


बंगळुरुला प्ले ऑफची संधी?
प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी बंगळुरुला पुढचे तीनही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. पण त्याचबरोबर सनरायजर्स हैदराबाद किंवा लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांपैकी एक संघ फक्त सामना जिंकावा अशी प्रार्थना बंगळुरुला करावी लागणार आहे. हैदराबादकडे 10 सामन्यातून 12 आणि लखनऊकडे 11 सामन्यातून 12 पॉईंटस जमा आहेत. इतकंच नाही तर चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स दोनपेक्षा अधिक सामने जिंकू नयेत याकडेही बंगळुरुला लक्ष ठेवावं लागेल. सीएसकेकडे 12 तर दिल्लीच्या खात्यात 10 अंक आहेत. 


असं झालं तर पाच संघांच्या खात्यात प्रत्येकी 14 पॉईंट जमा होतील. अशात नेट रन रेटच्या आधारे प्ले ऑफचा संघ निवडला जाईल. पण आरसीबीने पुढच्या तीनपैकी एक सामना जरी हरला तर मात्र बंगळुरुचं स्थान साखळीतच संपुष्टात येईल.


मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफचं गणित
पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघही (Mumbai Indians) पूर्णपणे प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. मुंबई इंडियन्सचे 11 सामन्यात सहा अंक आहेत. मुंबईचे अद्याप तीन सामने बाकी आहेत. तीनही सामने जिंकल्यास मुंबई इंडियन्सच्या खात्यात 12 पॉईंट जमा होतील. मुंबईच पुढचे तीन सामने सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळले जाणार आहेत. 


मुंबई इंडियन्सने पुढचे तीनही सामने जिंकले तर मुंबईला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. म्हणजे सनरायजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स पुढचा एकही सामना जिंकू नये अशी प्रार्थना मुंबई इंडियन्सला करावी लागेल. तसंच चेन्नईनेही पुढचे तीन सामने हरावेत आणि दिल्ली कॅपिटल्स केवळ एक सामना जिंकावा, तर पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स दोन पेक्षा जास्त सामन्यात विजय मिळवू नये अशा समीकरणावरही अवलंबून राहावं लागेल. 


मुंबई इंडियन्सच्या मनासारखं झालं तर सहा संघांच्या खात्यात प्रत्येकी 12 अंक जमा होतील. आणि नेट रनरटेच्य आधारी याचा निर्णय होईल.