कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) फलंदाज अंगकृष रघुवंशीला (Angkrish Raghuvanshi) बॅडमिंटन स्टार सायना नेहवालवर (Saina Nehwal) कमेंट केल्यानंतर टीकेचा सामना करावा लागला आहे. अंगकृष रघुवंशी याने 2024 मध्येच आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. यावेळी त्याने 155.24 च्या स्ट्राइक रेटने 10 सामन्यात 163 धावा केल्या होत्या. सायना नेहवालने बॅडमिंटन, टेनिस, बास्केटबॉल हे खेळ क्रिकेटच्या तुलनेत शारिरीकरित्या जास्त आव्हानात्मक असल्याचं म्हटलं होतं. तसंच तिने इतर खेळांच्या तुलनेत क्रिकेटला प्राधान्य देत असल्याने भारतीय चाहत्यांवर नाराजी जाहीर केली होती. 


सायना नेहवालने नेमकं काय म्हटलं होतं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"सायना काय करत आहे, कुस्तीपटू आणि बॉक्सर काय करत आहेत, नीरज चोप्रा काय करत आहेत हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे. प्रत्येकजण या खेळाडूंना ओळखत आहे, कारण आम्ही सातत्याने कामगिरी केली आहे. आम्ही वृत्तपत्रांमध्ये येत आहोत. हे भारतात केल्याने मला हे स्वप्नवतच वाटत आहे. कारण आपल्याकडे तितकी क्रीडा संस्कृती नाही,” असं सायनाने निखिल सिम्हा पॉडकास्टवर सांगितलं.


पुढे ती म्हणाली की, "कधीकधी मला क्रिकेटला इतकं लक्ष्य मिळतं याचं मला फार वाईट वाटतं. जर तुम्ही बॅडमिंटन, बास्केटबॉल, टेनिस आणि इतर खेळ पाहिले तर ते शारिरीकरित्या आव्हानात्मक आहे. तुम्हाला शटल उचलून सर्व्ह करण्यासाठीही वेळ नसतो. तुम्ही सतत थकलेले आणि श्वास घेत असता. पण माझ्या मते सर्वात जास्त लक्ष मिळत असलेल्या क्रिकेटमध्ये कौशल्य जास्त महत्वाचं आहे".



आधी टोला नंतर माफी


सायना नेहवालचं विधान अंगकृष रघुवंशीला फारसं आवडलं नाही. त्याने एक्सवर पोस्ट करत लिहिलं की, 'जर बुमरहाने तिच्या डोक्यावर ताशी 150 किमी वेगाने बंपर टाकल्यास काय होतं ते पाहूयात'. यानंतर त्याने आपील पोस्ट डिलीट केली आणि सायना नेहवालची माफी मागितली. "मी सर्वांची माफी मागतो. मा माझी टिप्पणी विनोदी आहे असं वाटत होतं. पण आता वळून पाहिलं असता हा फारच अपरिपक्व असल्याचं जाणवलं. मला माझी चूक लक्षात आली असून, त्यासाठी माफी मागतो".



तथापि, ही पहिलीच वेळ नाही जेव्हा एखाद्या खेळाडूने इतर खेळांकडे होणाऱ्या दुर्लक्षाबद्दल आपली नाराजी जाहीर केली. तत्पूर्वी, भारताचा बॅडमिंटन स्टार चिराग शेट्टी याने 2022 मध्ये थॉमस कपमधील विजयानंतर आपाल सत्कार केला नाही मात्र, टी-20 विश्वचषक विजेत्यांचा सत्कार केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारची निंदा केली होती.