मुंबई : ऑस्ट्रेलियातल्या टेस्ट सीरिजमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय टीम आता वर्ल्ड कपच्या तयारीला लागली आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होईल. याआधी भारत १३ वनडे आणि ५ टी-२० मॅच खेळणार आहे. यातल्या ३ वनडे भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर ५ वनडे न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियाची टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ५ वनडे आणि २ टी-२० मॅचची सीरिज होईल. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला सुरुवात होईल. बीसीसीआयनं या दौऱ्यामध्ये थोडे बदल केले आहेत.


वेळापत्रकामध्ये बदल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टीम ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ फेब्रुवारीपासून वनडे सीरिज खेळणार होती. यानंतर २ टी-२० मॅच खेळवण्यात येणार होत्या. पण आता पहिले टी-२० सीरिज आणि मग वनडे सीरिज होईल. पहिली वनडे २४ फेब्रुवारीला मोहालीऐवजी हैदराबादमध्ये २ मार्चला होईल. दुसरी वनडे २७ फेब्रुवारीला हैदराबादमध्ये होणार होती, पण ही वनडे आता ५ मार्चला नागपूरमध्ये होईल. तिसरी वनडे रांचीमध्ये ८ मार्चला होईल. आधीच्या वेळापत्रकानुसार ही वनडे २ मार्चला नागपूरमध्ये होणार होती. चौथी वनडे दिल्लीच्याऐवजी मोहालीमध्ये १० मार्चला होईल आणि शेवटची वनडे दिल्लीमध्ये १३ मार्चला होईल. या सीरिजमधल्या टी-२० मॅच संध्याकाळी ७ वाजता तर वनडे मॅच दुपारी १ वाजता सुरु होतील.


ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक


तारीख  मॅच  ठिकाण
२४ फेब्रुवारी पहिली टी-२० बंगळुरू
२७ फेब्रुवारी दुसरी टी-२० विशाखापट्टणम
२ मार्च  पहिली वनडे  हैदराबाद
५ मार्च  दुसरी वनडे नागपूर
८ मार्च तिसरी वनडे रांची
१० मार्च चौथी वनडे मोहाली
१३ मार्च पाचवी वनडे दिल्ली

ऑस्ट्रेलियाच्या सीरिजनंतर आयपीएल


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सीरिजनंतर भारतामध्ये आयपीएलला सुरुवात होईल. २३ मार्चपासून आयपीएल सुरु होईल, अशी घोषणा बीसीसीआयकडून मंगळवारी करण्यात आली होती. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आयपीएलचे सामने होतील. यानंतर भारत लगेचच वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला रवाना होईल.