भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) करिअरमध्ये आणखी एक धक्का बसला आहे. मुंबईच्या रणजी ट्रॉफी संघातून (Mumbai's Ranji Trophy squad) त्याला वगळण्यात आलं आहे. संघ व्यवस्थापनाने त्याला संघाबाहेर काढण्याची कारणं जाहीर केलेली नाहीत. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉचा फिटनेस आणि शिस्तबद्धतेबाबत असलेल्या दृष्टीकोनावर प्रशिक्षक नाराज आहेत.  संजय पाटील (अध्यक्ष), रवी ठाकर, जितेंद्र ठाकरे, किरण पोवार आणि विक्रांत येलिगेटी यांचा समावेश असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) निवड समितीने किमान एका रणजी ट्रॉफी सामन्यासाठी पृथ्वी शॉला वगळण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार, पृथ्वी शॉचा बेशिस्तपणा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी डोकेदुखी ठरत होता. निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाला पृथ्वी शॉला रणजी संघातून बाहेर काढवून धडा शिकवण्याची इच्छा आहे. 


पृथ्वी शॉ नेट प्रॅक्टिसला नेहमी उशिरा येणं संघ व्यवस्थापनासाठी सर्वात जास्त चिंतेची बाब आहे. रिपोर्टनुसार, तो नेट प्रॅक्टिसला अजिबात गांभीर्याने घेत नाही, तसंच नियमितपणे हजेरी लावत नाही. अनेकांनी त्याच्याकडे शिस्तीचा अभाव असून, वाढलेलं वजन चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. 


श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि अगदी कर्णधार अजिंक्य रहाणे सारखे दिग्गज क्रिकेटपटू सराव सत्राच्या बाबतीत नियमितपणे हजर असतात. दुसरीकडे, शॉ स्वस्तात बाद होऊनही काही सत्रं  चुकवतो. रिपोर्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, शॉला वगळण्याचा निर्णय केवळ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांचा नव्हता. कर्णधार आणि प्रशिक्षकही त्याला संघातून बाहेर ठेवण्यास उत्सुक होते.


2018 मध्ये राजकोटमध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध भारत कसोटी सामन्यातून पृथ्वी शॉने क्रिकेटमघ्ये पदार्पण केलं होतं. मात्र मैदानाबाहेरील समस्यांमुळे त्याची कारकीर्द उंचावण्यापेक्षा खाली येतानाच दिसत आहे. शॉने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या दोन रणजी सामन्यांमध्ये त्याने 7 आणि 12 (बडोद्याविरुद्ध), 1 आणि 39 नाबाद (महाराष्ट्राविरुद्ध) धावा केल्या आहेत.