मुंबई : न्यूझीलंडविरुद्धची वनडे सीरिज भारतानं २-१नं जिंकली आहे. याचबरोबर लागोपाठ ७ वनडे सीरिज जिंकण्याचा विक्रमही भारतानं केला आहे. असं असलं तरी भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडनं विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरिरावर टॅटू न काढणारे खेळाडूही मॅच जिंकवून देऊ शकतात. विराट कोहली काहीवेळा मैदानात जास्त आक्रमक होतो. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजआधी विराटनं केलेल्या वक्तव्यामध्ये आक्रमकता दिसून आली असं राहुल द्रविड बंगळूरच्या साहित्य संमेलनात म्हणल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडियानं दिली आहे. तसंच कोहलीला अंधपणे फॉलो करू नका असा सल्लाही राहुल द्रविडनं नव्या क्रिकेटपटूंना दिला आहे. याआधी अनिल कुंबळे आणि विराटमध्ये झालेल्या वादावरही द्रविडनं भाष्य केलं होतं.


अनिल कुंबळेसोबत जे झालं ते दुर्दैवी आणि अपमानास्पद होतं, असं राहुल द्रविड म्हणाला आहे. कुंबळेसोबत जे झालं ते योग्य नव्हतं. बंद दरवाज्याआड काय होतं याबाबत मी भाष्य करणार नाही. पण एवढ नक्की म्हणीन की अनिल कुंबळेसारख्या महान व्यक्तीसोबत जे झालं ते दुर्दैवी आहे, असं म्हणत द्रविडनं विराटचे कान टोचलेत.


विराट कोहली आणि अनिल कुंबळेमधल्या वादाला या वर्षी झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या टेस्ट सीरिजपासून सुरुवात झाल्याचं बोललं जातं. कुलदीप यादववरून या दोघांमध्ये वाद झाल्याची चर्चा होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्ये कुलदीप यादवला टीममध्ये घेण्यासाठी कुंबळे आग्रही होता, पण विराट कोहलीचा याला विरोध होता. अखेर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये कुलदीपला संधी मिळाली. या संधीचं सोनं करत कुलदीप यादवनं ४ विकेट घेतल्या. कुलदीप यादव आता भारतीय टीमच्या टेस्ट, वनडे आणि टी-20 चा महत्त्वाचा हिस्सा आहे.


त्यानंतर जुनमध्ये झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यावर अनिल कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. विराट कोहलीला माझ्या शैलीविषयी आक्षेप असल्यामुळे मी प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत असल्याचं अनिल कुंबळेनं ट्विटरवर सांगितलं होतं. यानंतर रवी शास्त्रीची भारताचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.


अनिल कुंबळे प्रशिक्षक असताना भारतानं लागोपाठ ५ टेस्ट सीरिज जिंकल्या होत्या. तसंच भारत टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर अनिल कुंबळे प्रशिक्षक असतानाच पोहोचला होता. अनिल कुंबळेनं टेस्टमध्ये ६१९ आणि वनडेमध्ये ३३७ विकेट घेतल्या होत्या.