राजकोट : पश्चिम बंगाल आणि सौराष्ट्रमध्ये सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी फायनलमध्ये वेगळीच घटना पाहायला मिळाली आहे. मॅचच्या दुसऱ्या दिवशी फक्त एकच अंपायर मैदानात होता. मॅचच्या पहिल्या दिवशी ९ मार्चला चेट्टीथोडी शमसुद्दीन या अंपायरना बॉल लागल्यामुळे ते दुखापतग्रस्त झाले. दुखापत गंभीर असल्यामुळे शमसुद्दीन दुसऱ्या दिवशी मैदानात येऊ शकले नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शमसुद्दीन यांच्या गैरहजेरीत केएन अनंतपद्मनाभन यांनी दोन्ही बाजूंनी अंपायरिंग केली. सुंदरम रवी हे या मॅचसाठी तिसरे अंपायर होते, पण डीआरएसचे निर्णय देण्यासाठी सुंदरम रवी यांना तिकडेच रहावं लागलं. 



रणजी ट्रॉफीच्या मॅचमध्ये फक्त २ अंपायरच असतात, तर मॅच रेफ्री तिसऱ्या अंपायरची भूमिका पार पाडतो. पण जर मॅच लाईव्ह दाखवण्यात येत असेल, तर मात्र तिसरा अंपायर वेगळा ठेवला जातो.


प्रथम श्रेणी मॅचमध्ये अंपायरला दुखापत झाली तर अंपायर आणि रेफ्री यांचा संपर्क अधिकारी स्क्वेअर लेग अंपायरची भूमिका बजावतो. या अंपायरला फक्त स्क्वेअर लेगला उभं राहण्याची परवानगी असते. या मॅचमध्ये पियुष कक्कर हे स्क्वेअर लेग अंपायर होते.