Utkarsha Pawar on Cricket Career: अनेक महिलांना लग्नानंतर तुमच्या करिअरचं आता काय? या प्रश्नाची सवय झाली आहे. त्यातही जर त्या अभिनेत्री, क्रिकेटर असतील तर सोशल मीडियावर युजर्स त्यांना वारंवार असे प्रश्न विचारत असतात. आपला मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याची बायको उत्कर्षा पवार हिलादेखील अशा प्रश्नांना सामोरं जावं लागतं. उत्कर्षादेखील क्रिकेटर असून तिने लग्नामुळे माझ्या क्रिकेट करिअरमध्ये अडथळा येणार नाही असं म्हटलं आहे. मी क्रिकेटर म्हणून सतत प्रगती करणार असून, भारतीय संघाची टोपी डोक्यावर असेल असं उत्कर्षा पवारने सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"जोवर माझी इच्छा आहे आणि माझं शरीर मला साथ देत आहे तोपर्यंत मी क्रिकेट खेळणं सुरु ठेवणार आहे. मला याची 100 नाही तर 200 टक्के खात्री आहे," असं उत्कर्षा पवारने (Utkarsha Pawar) म्हटलं आहे. 'कॉफी, क्रिकेट आणि बरंच काही' कार्यक्रमात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. 


चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांनी 3 जूनला पुण्यात लग्न केलं. तेव्हापासून दोघांचीही नावं वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतात. उत्कर्षा पवारने 2015-16 मध्ये महाराष्ट्राकडून वरिष्ठ आंतरराज्य स्पर्धेतून पदार्पण केलं. तेव्हापासून तिने 39 लिस्ट ए सामन्यात 28 आणि 45 टी -20 सामन्यात 26 विकेट्स घेतले आहे. दरम्यान उत्कर्षाने आपण भविष्याबद्दल चिंतित नाही असं सांगितलं आहे. 


"माझं लग्न झाल्यामुळे अनेकजण मला वारंवार करिअरबद्दल विचारणा करतात. घरातील नाही, पण बाहेरच्या लोकांना सतत याची चिंता असते. माझं कुटुंब मला नेहमी समर्थन देतं. ऋतुराजं कुटुंब तसंच माझे नातेवाईक नेहमी माझ्या पाठीशी असतात. पण बाहेरचे लोक प्रश्न विचारत बसतात," असं उत्कर्षाने सांगितलं. 


"मला माझे आई-वडील, पती ऋतुराज गायकवाड आणि सासू-सासऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. माझं आयुष्य क्रिकेटभोवतीच फिरत असल्याने जोवर माझी इच्छा आहे आणि जोवर मी खेळू शकते तोपर्यंत मी खेळत राहणार," असं उत्कर्षा पवारने म्हटलं आहे.


उत्कर्षाने यावेळी आपण लहानपणापासून कशाप्रकारे स्थानिक किक्रेटर असणारे वडील अमर यांच्या पावलावर पावलं टाकली याचा खुलासा केला. "मी लहान असताना झहीर खानला आदर्श मानत होते. त्याच्यासारखं वेगाने धावण्याची आणि वेगाने चेंडू टाकण्याची माझी इच्छा होती. तो डावखुरा आणि उजव्या हाताची इतकाच काय तो फरक होता," असं तिने सांगितलं. 


"माझी जलद गोलंदाजी करण्याची इच्छा पाहून, वडील मला अन्वर शेख यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी माझ्या गोलंदाजी कौशल्याला धार दिल. मी नेटमध्येही गेले होते, जिथे महाराष्ट्राचे माजी कर्णधार संतोष जेधे खेळाडूंना प्रशिक्षण देत असत", अशी माहिती तिने दिली. 


पण उत्कर्षा फक्त क्रिकेट खेळत नव्हती. तिने स्विमिंग, बॅडमिंटन आणि फूटबॉल यामध्येही रस घेतला. पण शेवटी क्रिकेटच आपल्याला जास्त आवडत असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिच्या गुरूंनी तिला मैदानापासून दूर राहा अन्यथा कोमल व्यक्तिमत्त्व गमावण्याचा धोका पत्करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर मात्र तिने कथ्थक सोडलं.


धोनीचं कौतुक


“महेंद्रसिंह धोनीचं एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे. जेव्हा तुम्ही त्याला भेटता तेव्हा आपोआप तोंडातून सर शब्द येतो. पण तो इतका नम्र आणि जमिनीशी जोडलेला आहे, हे अविश्वसनीय आहे,” असं ती म्हणाली. 


“फायनलनंतर मला त्याला भेटण्याची संधी मिळाली. त्याचा सेन्स ऑफ ह्यूमर चांगला आहे आणि तो त्याच्या सभोवतालचे वातावरण हलके ठेवण्याचा प्रयत्न करतो. तो प्रत्येकाला कुटुंबाप्रमाणे वागवतो," असं तिने सांगितलं.