मुंबई : जागतिक किर्तीचे खेळाडू घडविणारे आणि पद्मश्री, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे आज मुंबईत निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. वांद्रे येथील निवास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रिकेटचा महागुरू हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यासारख्या महान क्रिकेटपटूसह असंख्य नामवंत क्रिकेटपटू घडवणारे प्रशिक्षक म्हणून रमाकांत आचरेकर यांची खास ओळख आहे. रमाकांत विठ्ठल आचरेकर यांचा जन्म १९३२ मध्ये झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी १९४३ पासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. मात्र, ते क्रिकेटच्या मैदानावर प्रत्यक्षात उतलेले नाहीत. त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली खेळाडू घडविण्यात रस दाखवला. 




आचरेकर यांनी दादरला शिवाजी पार्क येथे कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली. त्यांनी आपल्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत अनेक क्रिकेटपटू घडवले. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, चंद्रकांत पंडित, जलगती गोलंदाज अजित आगरकर, डावखूरा फलंदाज विनोद कांबळी, प्रवीण आमरे यासारख्या क्रिकेटपटूंनी आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे घतले. आचरेकर सरांचा हा क्लब आणि त्यांचे कार्य आता त्यांची मुलगी कल्पना मुरकर हिने सुरु ठेवले आहे. १९९० मध्ये क्रीडा क्षेत्रातला मानाचा द्रोणाचार्य पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. तर २०१० मध्ये पद्मश्री पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आले होते.



31 ऑक्टोबर 2018 रोजी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी रमाकांत आचरेकरसरांची भेट घेतली होती. सचिनने ट्वीट करून याची माहिती दिली होती.