मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून तिघांची वर्णी लागली आहे. रवी शास्त्री हा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असेल तर राहुल द्रविड हा परदेश दौऱ्यासाठीचा प्रशिक्षक असेल. झहीर खानची बॉलिंग प्रशिक्षक म्हणून वर्णी लागली आहे. २०१९च्या वर्ल्ड कपपर्यंत हे तिघं प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहेत. बीसीसीआयचे कार्यवाहू अध्यक्ष सी.के.खन्ना यांनी ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी शास्त्रीनं २०१४पासून ते २०१६पर्यंत टीम इंडियाचा डायरेक्टर म्हणून काम पाहिलं होतं. तर राहुल द्रविड हा अंडर १९ टीमचा आणि आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचा प्रशिक्षक आहे.


टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड आज संध्याकाळपर्यंत करा असे आदेश सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी बीसीसीआयच्या सल्लागार समितीला दिले होते. या सल्लागार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांचा समावेश होते.


टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सल्लागार समितीनं पाच जणांच्या मुलाखती घेतल्या यात रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग, लालचंद राजपूत, रिचर्ड पायबस आणि टॉम मुडी यांच्या समावश होता. सहावा उमेदवार फील सिमन्स अनुपस्थित राहिला.