मुंबई: आयपीएल 2022 साठी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मेगा ऑक्शन होणार आहे. यावेळी ऑक्शनसाठी लखनऊ आणि अहमदाबाद असे दोन नवीन संघ असणार आहेत. प्रत्येक संघाला 4 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला आता चुरशीच्या खेळाडूंमधून केवळ चारच निवडता येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या टीम इंडियाच्या पहिल्या कसोटी सामन्यातून डेब्यू केलेल्या श्रेयस अय्यरला दिल्ली संघ रिटेन करणार नसल्याची चर्चा आहे. दिल्ली संघाने आपले चार खेळाडू निवडले आहेत. ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल आणि  एनरिच नॉर्ट्जे या चार जणांना दिल्ली संघ रिटेन करणार आहे. 


या यादीमध्ये कुठेच श्रेयस अय्यरचं नाव नाही. दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरला दिल्ली संघ रिटेन करणार नाही अशीही एक चर्चा रंगली आहे. श्रेयस अय्यरने पहिल्या कसोटी सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. 


गौतम गंभीरनंतर श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारले. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीने नवीन उंची गाठली. 2019 मध्ये, त्याच्या नेतृत्वाखाली, संघ प्लेऑफमध्ये गेला आणि तिसऱ्या क्रमांकावर होता. 2020 च्या आयपीएलमध्ये दिल्लीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, मात्र मुंबईकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 


IPL 2021 च्या सुरुवातीच्या टप्प्यात श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. त्यानंतर ऋषभ पंतला कर्णधारपद सोपवण्यात आलं. अय्यरने आयपीएल 2021 मध्ये दिल्लीसाठी 8 सामन्यात 175 धावा केल्या आहेत. अय्यर हा नेहमीच दिल्लीच्या फलंदाजीचा आधार राहिला आहे. अशा परिस्थितीत अय्यरला कायम न ठेवणे ही दिल्लीची मोठी चूक ठरू शकते.


कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरला भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या जागी पदार्पण करण्याची संधी मिळाली. अय्यरने या संधीचा फायदा घेत 13 चौकार आणि 2 षटकारांसह 105 धावांची शानदार खेळी खेळली. 


श्रेयस अय्यरच्या या कामगिरीमुळे भारताला 300 हून अधिक धावा करता आल्या. अय्यरने अतिशय संयमी खेळी खेळली आणि जडेजासोबत मोठी भागीदारी केली. ज्याचा फायदा टीम इंडियाला झाला आहे.