लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बांग्लादेशला हरवून भारत फायनलमध्ये पोहोचला आहे. भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले रोहित शर्मा आणि विराट कोहली. रोहित शर्माचं शतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे २६५ रन्सचं आव्हानं भारतानं ९ विकेट राखून पार केलं. रोहित शर्मानं १२९ बॉल्समध्ये नाबाद १२३ रन्सची खेळी केली तर विराटनं ७८ बॉल्समध्ये नाबाद ९६ रन्स केल्या. शिखर धवननं ३४ बॉल्समध्ये ४६ रन्सची खेळी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि सुरुवातीलाच बांग्लादेशला दोन धक्के दिले. त्यानंतर मात्र तमीम इक्बाल आणि मुशफिकूर रहीम यांनी बांग्लादेशचा डाव सावरला.


तमीम आणि मुशफिकूरमध्ये तिसऱ्या विकेटसाठी तमीमनं मुशफिकूर रहीमबरोबर १२३ रन्सची पार्टनरशीप केली आणि बांग्लादेशचा डाव सावरला.  तमीम इक्बालनं ८२ बॉल्समध्ये ७० रन्सची खेळी केली. तर मुशफिकूर रहीमनं ८५ बॉल्समध्ये ६१ रन्स केल्या. कॅप्टन मशरफी मोर्तजानं शेवटी फटकेबाजी करून बांग्लादेशला २६४/७ पर्यंत पोहोचवलं. भारताकडून भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि केदार जाधवनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाला एक विकेट घेण्यात यश आलं.