नागपूर : भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या जागी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी ऑलराऊंडर विजय शंकरला स्थान देण्यात आलेय. भारतीय संघात स्थान मिळाल्याने विजय शंकर चांगलाच खुश झालाय. त्यानंतर आता कोहलीने केलेल्या विधानाने तर त्याचा आनंद द्विगुणित केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तामिळनाडू संघाचा कर्णधार विजय शंकर आता भारतीय संघाचा हिस्सा बनलाय. श्रीलंकेविरुद्धच्या या कसोटीत त्याची कामगिरी चांगली झाली तर तो पुढेही टीम इंडियासाठी खेळत राहू शकतो. 


विजय शंकरला हार्दिक पांड्याप्रमाणेच ऑलराऊंडर मानले जाते. २०१६मध्ये भारत अ कडून खेळताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड झाली होती. मात्र दुखापतीमुळे तो दौऱ्यात सहभागी होऊ शकला नाही. त्याच्या जागी हार्दिक पांड्याला संधी मिळाली आणि त्यानंतर पांड्याची भारतीय संघात निवड झाली. 


श्रीलंकाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी कर्णधार विराट कोहली म्हणाला, हार्दिक पांड्याला दुसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आलीये. तर भुवनेश्वरच्या जागी शंकरला संघात स्थान देण्यात आलेय. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या आगामी दौऱ्यासाठी त्याची निवड केली जाऊ शकते असे संकेत कोहलीने दिलेत. 


शंकर सातत्याने चांगली कामगिरी करतोय आणि याचमुळे त्याला संघात स्थान मिळालेय. आम्हाला एका वेगवान गोलंदाजाची गरज आहे. हार्दिकला आमची पहिली पसंती आहे. मात्र त्याच्यासारखे अधिक ऑप्शन आम्ही निवडतोय ज्यांची परदेशी दौऱ्यांवर बॅकअप म्हणून निवड होऊ शकेल.