Mumbai Vs Tamil Nadu Ranji Trophy : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध टेस्ट मालिका (IND vs ENG Test) जिंकल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) खेळाडूंना चांगलंच झापलं होतं. ज्यांच्या मनात कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा नाही, ते त्यांच्या तोंडावर दिसतं. त्यांना बळजबरीने का खेळवावं? असा खोचक टोला रोहित शर्माने रणजी न खेळणाऱ्या खेळाडूंना लगावला होता. रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) खेळायचं म्हटलं तर इशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक चहर याच्यासह इतर खेळाडू नाक मुरडतात. त्यामुळे बीसीसीआय (BCCI) देखील नाराज असल्याचं समोर आलं होतं. अशातच आता श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) मोठा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयस अय्यर रणजी ट्रॉफीच्या 2 मार्च रोजी सेमीफायनल सामन्यात मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. श्रेयस अय्यरने सेमीफायनलच्या सामन्यासाठी स्वत:ला उपलब्ध असल्याचं घोषित केल्याची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिली. मात्र, श्रेयस अय्यर तोंड लपवण्याची वेळ आल्याचं पहायला मिळतंय. श्रेयस अय्यरने सेमीफायनलसाठी स्वत:ला फिट नसल्याचं घोषित केलं होतं. मात्र, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (NCA) अय्यर खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचं म्हटल्याने श्रेयस अय्यर चांगलाच अडचणीत सापडला होता. 


श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्घच्या कसोटी सामन्यात संधी मिळाली होती. मात्र, तिसऱ्या कसोटीपूर्वी श्रेयस जायबंदी असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे तो तिसरी कसोटी देखील खेळला नाही. तसंही पहिल्या दोन कसोटीमध्ये त्याचं प्रदर्शन अतिशय लज्जास्पद राहिलं होतं. त्यामुळे त्याला अधिकची संधी मिळणार नव्हती. अशातच श्रेयस बाहेर पडला अन् तो रणजी देखील खेळण्यास उतरला नाही. मात्र,  टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यरने सेमीफायनलसाठी आपण तयार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता येत्या 2 मार्चला तो मैदानात दिसण्याची शक्यता आहे.


आणखी वाचा - आयपीएलच्या तोंडावर BCCI चा मोठा निर्णय; 'या' खेळाडूंचा वाढवणार पगार?


दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने भविष्यात कसोटी क्रिकेट गांभीर्याने न घेणाऱ्या खेळाडूंना स्थान मिळणार नाही, असा इशारा दिला होता. तर बीसीसीआयची टांगती तलवार देखील कायम आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरने यु-टर्न घेतल्याची चर्चा होताना दिसते.