मॅनचेस्टर : २०१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पहिली फायनल टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. मंगळवार ९ जुलैरोजी मॅनचेस्टरमध्ये ही मॅच खेळवण्यात येणार आहे. पण या मॅचवर पावसाचं सावट आहे. त्यामुळे सामना रद्द झाला तर कोणती टीम फायनलला पोहोचणार, असा सवाल क्रिकेट रसिकांना पडला असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या काही मॅच या पावसामुळे रद्द झाल्या. एका वर्ल्ड कपमध्ये एवढ्या मॅच पावसाने रद्द व्हाययची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे आयसीसीच्या नियोजनावरही बरीच टीका झाली होती. पण वर्ल्ड कपच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र एकही मॅच पावसामुळे रद्द झाली नाही.


आता सेमी फायनलच्या वेळी इंग्लंडमधल्या हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. पण आयसीसीने सेमी फायनल आणि फायनल मॅचसाठी राखीव दिवस ठेवले आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी मॅच होऊ शकली नाही, तर दुसऱ्या दिवशी सामना खेळवण्यात येईल.


मॅनचेस्टरमध्ये मंगळवारी मॅच झाली नाही तर हा सामना बुधवारी खेळवण्यात येईल. पण मॅनचेस्टरमध्ये बुधवारीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन्ही दिवशी पावसामुळे सामना झाला नाही, तर टीम इंडिया मॅच न खेळताच फायनलमध्ये प्रवेश करेल.


आयसीसीच्या नियमांनुसार दोन्ही दिवशी सामना होऊ शकला नाही, तर ग्रुप स्टेजमध्ये जी टीम पॉईंट्स टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर असेल, ती टीम फायनलमध्ये प्रवेश करेल. पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर तर न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर राहिली, त्यामुळे टीम इंडियाला फायनलमध्ये प्रवेश मिळेल.