मुंबई : युवराज सिंगची गणना टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. टी-20 विश्वचषक (2007) आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयात युवराजचे मोठे योगदान होते. 2011 च्या विश्वचषकात युवराजने आपल्या चमकदार कामगिरीमुळे प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब पटकावला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही युवराजला एकाही सामन्यात कर्णधारपदाची संधी मिळाली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचे कर्णधारपद न मिळाल्याने युवराज सिंगने खंत व्यक्त केलीये. युवराजने एका स्पोर्ट्स चॅनलवर भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, ग्रेग चॅपल वादात सचिन तेंडुलकरला पाठिंबा दिल्यामुळे त्याला कर्णधारपद मिळू शकले नाही. कारण त्याचा हा निर्णय बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या पचनी पडला नाही. या निर्णयामुळे त्यांना उपकर्णधारपदावरून हटवण्यात आल्याचे त्याने म्हटलं आहे.


मी सचिनला पाठिंबा दिला : युवराज


युवराज म्हणाला, 'मला कर्णधार व्हायचे होते. त्यानंतर ग्रेग चॅपलची घटना घडली, जी चॅपल विरुद्ध सचिन अशी झाली. समर्थन करणारा मी कदाचित एकमेव खेळाडू होतो. बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांना हे आवडले नाही. असे म्हणतात की ते कोणालाही कर्णधार बनवण्यास तयार होते. पण मला नाही.'


युवराज म्हणाला, 'हे कितपत खरे आहे याची मला खात्री नाही. अचानक मला उपकर्णधारपदावरून वगळण्यात आले. सेहवाग संघात नव्हता. पण माही (MS Dhoni) अचानक 2007 टी-20 वर्ल्ड कपसाठी कर्णधार बनला. मला वाटले की मी कर्णधार होणार आहे.


मला खेद नाही : युवराज


तो म्हणाला, 'वीरू (वीरेंद्र सेहवाग) सीनियर होता, पण तो इंग्लंड दौऱ्यावर नव्हता. मी एकदिवसीय संघाचा उपकर्णधार होतो, तर राहुल द्रविड कर्णधार होता. त्यामुळे मला कर्णधार व्हायचे होते. साहजिकच हा निर्णय माझ्या विरोधात गेला होता, पण मला त्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. आजही असा वाद झाला तरी मी माझ्या सहकाऱ्याला साथ देईन.'