मुंबई : टेलिकॉम कंपनी एअरसेल दिवाळखोरीच्या स्थितीमध्ये आली आहे. कंपनीनं नॅशनल कंपनी ट्रिब्यूनलकडे दिवाळखोरीसाठी अर्जही दाखल केला आहे. एअरसेल कंपनी बंद झाल्यावर त्यांच्या सगळ्या सर्कलच्या सेवाही बंद होणार आहेत. दिवाळखोरीचा अर्ज देण्याआधीच कंपनीनं त्यांच्या बोर्डला रद्द केलं आहे. दिवाळखोर घोषित झाल्यावर एअरसेल कंपनी म्हणून संपुष्टात येईल. एअरसेल दिवाळखोरीत निघाल्यामुळे आता बाजारात व्होडाफोन, एअरटेल, जिओ, आयडिया या खासगी कंपन्या तर एमटीएनएल आणि बीएसएनएल या सरकारी टेलिकॉम कंपन्याच बाकी आहेत. आयडिया-व्होडाफोनचं मर्जर झाल्यावर फक्त तीनच कंपन्या बाजारात राहतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरसेलनं मागच्या वर्षी सप्टेंबरनंतर बँकांच्या कर्जाचे हफ्ते दिले नाहीत. १५,५०० कोटी रुपये रिस्ट्रक्चर करण्यासाठी एअरसेल आणि मलेशियाची कंपनी मॅक्सिसमध्ये बातचित सुरु होती. पण रिजर्व्ह बँकेनं रिस्ट्रक्चरींगवर बंदी घातल्यामुळे एअरसेलला हा निर्णय घ्यायला लागला.


प्रत्येक महिन्याला ४०० कोटींची कमाई


एअरसेल प्रत्येक महिन्याला ४०० कोटींची कमाई करते. यातले १०० कोटी रुपये एअरसेलला दुसऱ्या टेलिकॉम कंपन्यांना टर्मिनेशन चार्ज म्हणून द्यावे लागतात. तर २८० कोटी रुपये वेंडर आणि नेटवर्क अपटाईमसाठी खर्च करावे लागतात. उरलेले पैसे लायसन्स फी, टॅक्स आणि इंटरेस्ट पेमेंटसाठी द्यावे लागतात. एअरसेलनं आयडियाला तीन महिन्यांचे ६० कोटी रुपयांचं इंटरकनेक्ट शुल्कही दिलेलं नाही.


पाच हजार कर्मचारी अडचणीत


एअरसेल बंद झाल्यानंतर ५ हजार कर्मचारीही अडचणीत सापडले आहेत. फक्त कर्मचारीच नाही तर वेंडर, पार्टनर, टॉवर ऑपरेटर जीटीएल इंफ्रा, भारती इंफ्राटेल, इंडस टॉलर आणि एटीसीवरही याचा प्रभाव पडणार आहे.