मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी... दहावीला क्रीडा आणि कलेतील प्राविण्याच्या गुणांचे प्रमाण 10 गुणांनी कमी करण्यात आलंय.. वाढणा-या टक्केवारीला आटोक्यात आणण्यासाठी राज्य शिक्षण मंडळानं हा निर्णय घेतलाय.  त्यामुळे आता विद्यार्थ्यांना कलेतील प्राविण्यासाठी 25 ऐवजी केवळ 15 गुणच मिळू शकणार आहेत. 


विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला राखीव कोटाही रद्द


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच अकरावी प्रवेशासाठी कलाकार विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला राखीव कोटाही रद्द करण्यात आला आहे. शास्त्रीय नृत्य, संगीत यांच्या तीन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सरसकट 5 ते 15 गुण देण्यात येत होते. मात्र आता नृत्य किंवा संगीताच्या सरकारमान्य संस्थेने घेतलेल्या परीक्षेत किती गुण मिळाले किंवा श्रेणी मिळाली त्यावर अतिरिक्त गुण अवलंबून असणार आहेत.


क्रीडा किंवा एकाच कलाप्रकारचे गुण


किमान तीन ते कमाल 15 गुण विद्यार्थ्यांना मिळू शकतील.. राज्य किंवा राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना 25 गुण देण्यात येत होते. ते गुण आता मिळू शकणार नाहीत. तसंच एका विद्यार्थ्याला क्रीडा किंवा एकाच कलाप्रकारचे गुण मिळू शकतील.


कलावंतांनाही आता अतिरिक्त गुणांचा लाभ


चित्रपटात राज्य किंवा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या विद्यार्थी कलावंतांनाही आता अतिरिक्त गुणांचा लाभ मिळू शकणार आहे..तसेच बहिस्थ शिक्षण देणा-या विद्यार्थ्यांनाही अतिरिक्त गुणांची सवलत मिळणार आहे.