मुंबई : आजच्या स्मार्ट आणि डिजिटल जगात मोबाईल फोन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तर आता आपल्या हातात असलेला  १० अंकांचा मोबाईल नंबर लवकरच ११ अंकांचा होणार आहे. यासाठी सरकारने देखील एक पाऊल पुढे टाकलं आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडिया (TRAI) ने शुक्रवारी देशात ११ अंकांचा मोबाईल नंबर वापरात आणण्याचा प्रस्ताव जारी केला आहे. त्या दिशेने काम देखील सुरू करण्यात आलं आहे. ट्रायच्या सांगण्यानुसार १० अंकांच्या मोबाईल नंबरचे रूपांतर ११ अंकांमध्ये करण्यात आलं तर देशात जास्त नंबर सक्रिय करण्यास मदत होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर मोबाईल नंबर १० ऐवजी ११ अंकांचा करण्यात आला तर देशात  मोबाईल नंबरची उपवब्धता वाढेल. ट्रायच्या या निर्णयावर जर का शिक्कामोर्तब करण्यात आला तर मोबाईल नंबरचा सुरवातीचा अंक ९ असेल. तर एकूण १० अब्ज मोबाइल नंबर देशात तयार करण्यात सक्षम होतील. असं ट्रायकडून सांगण्यात येत आहे. 


नियामकाने असेही सुचवले की लँड लाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी मोबाईल क्रमांकापूर्वी शून्य असणे आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त नवीन राष्ट्रीय क्रमांकाची योजना सुचविण्यात आली आहे. तसेच ट्रायने डोंगलसाठी वापरला जाणारा मोबाईल क्रमांक १० अंकी वरून १३ अंकांपर्यंत वाढवण्याचा सल्ला दिला आहे.


म्हणजे लवकरच आपला १० अंकी मोबाइल नंबर ११ अंकांचा होणार आहे. उल्लेख विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत मोबाइल फोन ग्राहकांची वाढती संख्या पाहता ट्राय गेल्या काही वर्षांपासून या प्रस्तावावर विचार करत आहे. दरम्यान देशात लवकरच लागू करण्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.