सातारा: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एलबीटीवरुन भाजपवर केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी प्रत्युत्तर दिले. रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही, अभ्यास करुन बोलावे, असा टोला त्यांनी लगावला. सातारा जिल्ह्यातील करोनाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर...'

यावेळी त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात एलबीटी जरी असता तरी आपल्याला पैसे मिळाले नसते. उगाच काहीतरी आकडे सांगायचे. एवढे मिळाले पाहिजे, तेवढे मिळाले पाहिजे. एलबीटी रद्द केल्याने महाराष्ट्राचे २६ हजार कोटींचे नुकसान झाले, तोटा झाला बोलून रोहित पवार  काहीतरी आकडे सांगतात. त्यांनी असे न करता नीट अभ्यास करुन बोलायला पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले. 

याशिवाय, नुकत्याच झालेल्या जीएसटी बैठकीत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी जीएसटीच्या थकबाकीवरून केंद्र सरकारकडे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर रोहित पवार यांनी भाजपला लक्ष्य केले होते. भाजपवाल्यांना खरंच महाराष्ट्रातील जनतेबद्दल कळवळा असता तर केंद्राकडे अडकलेले जीएसटीचे पैसे त्यांनी मागितले असते, असे सांगत त्यांनी विरोधकांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला होता. 


जीएसटी बैठकीतल्या 'त्या' मागणीवरून भाजपची अजित पवारांवर टीका

रोहित पवारांच्या या आरोपाचेही देवेंद्र फडणवीस यांनी खंडन केले आहे. केंद्र जीएसटीचे पैसे देत नाही अशी ओरड सातत्याने केली जात आहे. खोटं बोल पण रेटून बोल अशी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे. खरंतर, केंद्र सरकारने राज्यांना देणे असलेले मागील वर्षीचे म्हणजेच, मार्च २०२० पर्यंतचे १९,५०० रुपये आधीच दिले आहेत. साथ रोग कायद्याच्या नावाखाली केंद्र सरकार ते नाकारूही शकलं असतं. पण केंद्राने तसं केलेलं नाही. आताची जी मागणी होतेय, ती मार्चनंतरच्या जीएसटीची असल्याकडे फडणवीसांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.