काबूल : Afghanistan Crisis : अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर तालिबानने (Taliban) भारताबद्दल त्यांच्या विचारसरणीचे पहिले उदाहरण दाखवून दिले आहे. तालिबानने भारताबरोबरची आयात आणि निर्यात (Export-Import) दोन्ही बंद केली आहे. अशरफ गनी सरकारच्या कार्यकाळात भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध खूप सौहार्दपूर्ण निर्माण झाले होते. भारताने अफगाणिस्तानातील अनेक विकास प्रकल्पांना प्राधान्य देत विकासाला चालना दिली होती. पण आता पूर्वीसारखेच संबंध टिकून राहण्याची फारशी आशा नाही.


तालिबानने मालवाहतूक थांबवली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे (FIEO)  डॉ. अजय सहाय यांनी आयात-निर्यातीवर तालिबानी बंदीला दुजोरा दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, डॉ. सहाय म्हणाले की तालिबानने यावेळी सर्व मालवाहतूक बंद केली आहे. आमचा माल पाकिस्तानातून अनेकदा पुरवला जात असे, ज्यावर सध्या बंदी घालण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले, 'आम्ही अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, जेणेकरून आम्ही पुरवठा सुरू करू शकू. पण सध्या तालिबानने निर्यात-आयात बंद केली आहे.


भारत अफगाणिस्तानचा मोठा भागीदार आहे


डॉ. अजय सहाय यांनी सांगितले की, भारत व्यापाराच्याबाबतीत अफगाणिस्तानचा सर्वात मोठा भागीदार आहे. 2021 मध्येच आपली निर्यात 835 दशलक्ष अमेरिकन डॉलर होती, तर आयात 510 दशलक्ष डॉलर होती. आयात-निर्यात व्यतिरिक्त, भारताने अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे, ज्यात सुमारे 400 योजनांमध्ये 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक समाविष्ट आहे.


सुका मेवा महागण्याची शक्यता


भारत साखर, चहा, कॉफी, मसाल्यांसह इतर वस्तू निर्यात करतो, तर ड्राय फ्रूट्स, कांदे इत्यादी मोठ्या प्रमाणावर आयात केल्या जातात. त्यामुळे अफगाणिस्तानच्या संकटामुळे येत्या काही दिवसांमध्ये सुक्या मेव्याच्या किमती वाढू शकतात, असे सांगितले जात आहे. कारण भारत अफगाणिस्तानमधून सुमारे 85 टक्के सुका मेवा आयात करतो. तत्पूर्वी, तालिबानने घोषित केले होते की त्याला भारताशी चांगले संबंध हवे आहेत, तसेच भारत आपले सर्व चालू असलेले काम आणि गुंतवणूक कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करू शकतो. तथापि, तालिबानच्या बोलण्यात आणि कृतीत मोठा फरक आहे, त्यामुळे सध्या काही सांगणे कठीण आहे.