नवी दिल्ली : इम्रान खान सरकारवर बिलावल भुट्टोने जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. पूर्वी आपण श्रीनगर काबीज करण्याची भाषा करायचो, आज आपल्यावर मुजफ्फराबाद वाचवण्याची वेळ आलीय असं बिलावल भुट्टो यांनी म्हटलं आहे. अर्थव्यवस्था गाळात गेल्यानं पाकिस्तानी जनतेचे हाल होत आहेत. लष्करानं निवडलेला पंतप्रधान लष्कराच्या तालावरच नाचतोय. त्यामुळे देशाचं वाटोळं झालंय असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान पीपुल्स पार्टी (पीपीपी) चे चेयरमन बिलावल भुट्टो यांनी मंगळवारी पाकिस्तान सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटलं की, 'इम्रान खान सरकार आतापर्यंतच सर्वात अपयशी सरकार ठरलं आहे. तुम्ही झोपेत होता आणि मोदींनी काश्मीर हिसकावून घेतलं. श्रीनगर कसं मिळेल याची आधी योजना आखायचो. पण आता मुजफ्फराबाद कसं वाचवायचं याचा विचार करावा लागत आहे.'


काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान भारताला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. पण आतापर्यंत कोणत्याच बाबतीत तो यशस्वी झालेला नाही. जागतिक संघटना आणि इतर मुस्लीम देशांनी देखील पाकिस्तानला साथ न देता भारताचं समर्थन केलं आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर आता देशातूनच टीका होऊ लागली आहे. सध्या पाकिस्तान आर्थिक संकटात देखील सापडला आहे.