नवी दिल्ली : रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह (Sergey Lavrov) यांनी शुक्रवारी भारत दौर्‍यावर असताना मोठे विधान केले आहे. लाव्हरोव्ह यांच्या विधानाने अमेरिकेला ही झटका बसला आहे. भारतानं मॉस्को आणि कीव्हमध्ये मध्यस्थी केल्यास ते स्वागतार्ह असेल, असं वक्तव्य रशियाचे परराष्ट्र मंत्री लाव्हरोव्ह यांनी केलं आहे. रशिया युक्रेन युद्धाला महिना उलटून गेला तरी अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. अजूनही दोन्ही राष्ट्रांमध्ये बोलणी सुरूच आहेत. (Foreign Minister Sergey Lavrov on India)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी गुरुवारी नवी दिल्लीत आलेले लावरोव्ह यांनी स्वतंत्र भारतीय परराष्ट्र धोरणाचेही कौतुक केले. तसेच ऊर्जेच्या वाढत्या किमती आणि रशियावरील निर्बंध यांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.


ते म्हणाले की भारतीय परराष्ट्र धोरण हे स्वातंत्र्य आणि खरे हित यावर लक्ष केंद्रित करते. हे रशियन फेडरेशनमधील धोरण आहे आणि ते आम्हाला चांगले मित्र आणि निष्ठावान भागीदार बनवते.


अमेरिकेकडून भारतावर दबाव टाकला तरी त्याचा भारत रशिया संबंधांवर परिणाम होणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. भारतावरील अमेरिकेच्या दबावाबाबत विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले.