Israel Hamas War: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेले युद्ध प्रत्येक क्षणाला वेगळे वळण घेत आहे. यामध्ये दोन्हीकडचे हजारो नागरिक, सैनिक मारले जात आहेत. दरम्यान हमासच्या सैनिकांना संपवूनच युद्ध संपविण्याच्या पावित्र्यात इस्रायली सैनिक दिसत आहेत. इस्रायलच्या सशस्त्र दलांनी हमासने ताब्यात घेतलेल्या एका चेकपॉईंटवर पुन्हा ताबा मिळवला आणि  250 ओलिसांची सुटका केल. या क्षणाचे नाट्यमय फुटेज इस्रायलने समोर आणले आहे. यामध्ये इस्रायलचे सैनिक हमासच्या सैनिकांना कशाप्रकारे पकडून मारत आहेत, याचे चित्रिकरण दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्लोटिला 13 एलिट युनिटच्या सदस्यांनी परिधान केलेल्या बॉडी कॅमेऱ्यातील व्हिडिओ गुरुवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आला. या व्हिडीओत एका अंधारलेल्या खोलीच्या मजल्यावर मृतदेह दिसत आहेत. असे असले तरी ओलिस होते की दहशतवादी हे व्हिडीओ पाहून स्पष्ट होत नाही. 


दुसर्‍या खोलीत, सैन्याने प्रवेश केल्यावर लोकांचा एक गट उभा दिसतो. हे बहुधा ओलीस असावेत असे दिसते.  बंकरमध्ये रहा, आम्ही येत आहोत, असे एक अधिकारी ओरडताना ऐकू येते. दरम्यान इस्रायली सैनिकांनी सुटका केलेल्यांची ओळख आणि राष्ट्रीयत्व उघड केले गेले नाही. अपहरण केलेल्या सुमारे 20 अमेरिकन लोकांचा अद्याप शोध लावता आला नाही. 



इस्रायलच्या सुरक्षा दलाने उत्तरेकडील गाझा पट्टीमध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांना आणीबाणीचा इशारा दिला आहे. येथील 10 लाख पॅलेस्टिनी नागरिकांना इस्रायलने पुढील 24 तासांमध्ये गाझा पट्टी खाली करण्यास सांगितलं आहे. आम्ही या ठिकाणी मोठा हल्ला करणार असून तातडीने हा प्रदेश खाली करावा असं इस्रायलकडून सांगण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्रांनाही यासंदर्भातील माहिती इस्रायलकडून देण्यात आली आहे.


7 तारखेपासून सुरु आहे संघर्ष


मागील 6 दिवसांपासून या भागावर इस्रायल हवाई हल्ले करत आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून दिलेल्या इशाऱ्याचा असाही अर्थ काढला जात आहे की आज म्हणजेच शुक्रवार 13 ऑक्टोबर रोजी जमीनीवरुन गाझा पट्टीवर हल्ला करणार आहे. हमास या पॅसेल्टीनी दहशतवादी संघटनेनं शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये घुसखोरी करुन अनेक गावांमध्ये नरसंहार केल्यानंतर इस्रायल पॅलेस्टाइन युद्धाला नव्याने तोंड फुटलं आहे. वाडी गाझा या प्रदेशामध्ये 11 लाख पॅसेल्टीनी नागरिक वास्तव्यास आहेत. 


भारताने स्पष्ट केली भूमिका


हमासच्या अतिरेक्यांनी 7 ऑक्टोबर रोजी केलेला हल्ला हा 'दहशतवादी कृत्य'च असल्याचं मानतो, असं भारताने म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याला भारताचा पाठिंबा कायम राहणार असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केलं आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइन या दोघांनी शांततेमध्ये नांदावं यासाठी चर्चेच्या माध्यमातूनच यावर तोडगा शोधला पाहिजे अशी भारताचा भूमिका असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागहची यांनी म्हटलं आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भारत खंबीरपणे इस्रायलच्या पाठीशी उभा असल्याचं स्पष्ट केलं होतं.