नवी दिल्ली : कुलभूषण जाधव प्रकरणी हेग आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीचा आजचा शेवटचा दिवस आहे. १८ आणि २० तारखेला भारताने आपली बाजू मांडली. १९ तारखेला पाकिस्तानला आपली बाजू मांडली. आज पुन्हा पाकिस्तान आपली बाजू मांडणार आहे. भारताने आपली बाजू मांडल्यानंतर आता शेवटच्या दिवशी पाकिस्तानला आपली बाजू मांडण्यासाठी ९० मिनिटांचा कालावधी मिळणार आहे. या सुनावणी नंतर आंतरराष्ट्रीय न्यायालय मे महिन्यापर्यंत या प्रकरणाचा निकाल देण्याची शक्यता आहे. पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांचे अपहरण करण्यात आले आहे. ते गुप्तहेर नाहीत, असा युक्तिवाद भारताचा आहे. कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलातून निवृत्त झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच मे २०१७ मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर १८ मे २०१७ रोजी या खटल्याचा निकाल देत नाही, तोपर्यंत कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची अंमलबजावणी करू नये, असे आदेश १० न्यायाधीशांच्या पीठाने पाकिस्तानला दिले. पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले आहे. भारताच्या उच्चायुक्तांना जाधव यांना भेटण्यास परवानगी दिली जात नाही, असेही भारताने न्यायालयात म्हटले आहे. कुलभूषण जाधव यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी भारताने न्यायालयात केली आहे. 



 पाकिस्तानमधील एकूण वातावरण बघता कुलभूषण जाधव यांना त्या देशात न्याय मिळेल, असे भारताला वाटत नाही, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांनी केला. कुलभूषण जाधव यांना भारतीय गुप्तहेर आणि दहशतवादी म्हणून पाकिस्तानकडून त्यांचा भारताविरोधात वापर करून घेण्यात येत आहे, असेही साळवे यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले होते. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले होते.