मुंबई : लग्न म्हणजे दोन जिवांचं मिलन...आपल्या देशात लग्नसंस्कृतीला खूप महत्व आहे. लग्नाबाबात समाजाची, कुटुंबाची बंधनं असली तरी कायदयाने मात्र आपला जोड़ीदार निवडण्याचा अधिकार प्रत्येकाला देण्यात आला आहे. पण सौदी अरेबियात मात्र एक विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौदी अरेबिया सरकारने आता आपल्या देशातील पुरुषांसाठी त्यांनी कोणत्या महिलेशी लग्न करावे, किंबहुना करू नये याबाबतचे शासकीय नियम घालून दिले आहेत. त्यामुळे सौदीच्या पुरुषांना सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तिक चौकटीसोबतच सरकारी नियमांचे ओझेही आता बाळगावे लागणार आहे. 


सौदी अरेबियाने का केला असा नियम?


हा नियम आणण्यामागचे कारण आहे सौदी अरेबियात वाढलेली परदेशी महिलांची संख्या. एका आकडेवारीनुसार सौदीत 5 लाख परदेशी महिला राहतात. त्यामुळे आपल्या देशातील पुरुषांचे आंतरराष्ट्रीय विवाह होऊ नयेत, असं सौदी अरेबिया सरकारला वाटते. 


सरकारच्या नियमामुळे सौदी अरेबियातील पुरुष पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारमधील मुलींशी निकाह करू शकणार नाहीत.


सौदी अरेबियातील पुरुषांना परदेशी महिलांशी विवाह करण्यापासून परावृत्त करण्यासाठी इथल्या सरकारनं हे पाऊल उचलले आहे. त्यातूनही एखाद्या सौदी नागरिकाला परदेशी महिलेसोबत लग्न करायचे असेल तर सर्व कायदेशीर बाबिंची पूर्तता करावी लागेल.


ही कायदेशीर प्रक्रीया प्रचंड किचकट आणि वेळखाऊ आहे. त्यामुळे सौदीतले पुरुष आपोआपच परदेशी महिलेशी निकाह करण्याचा विचार सोडून देतील. लग्नाबाबत इथे पुरुषांवर बंधने असली तरी महिलांवरही बऱ्याच अंशी निर्बध आहेत. इथं महिलानी घटस्फोट घेणं कठीण आहे.


घटस्फोटासाठी एकतर तिच्या नवऱ्याची संमती हवी किंवा नवरा त्रास देत असल्याचा पुरावा त्या महिलेकडे असायला हवा. थोडक्यात काय तर सौदीतले जगणे सुखवस्तू वाटत असले तरी सुखी संसाराचे स्वप्न सत्यात उतरवणे कठीण आहे.