मुंबई : साडे तीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा असलेल्या अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत 'अष्टपदी' या नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मराठीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. 'अष्टपदी' हा चित्रपटही त्याच पठडीतील ठरणार आहे. भारतीय विवाह संस्कृतीमध्ये सप्तपदीला खूप महत्त्व आहे, पण या चित्रपटाचं शीर्षक 'अष्टपदी' असल्याने यात नेमकं काय पाहायला मिळणार याबाबत कुतूहल जागं होतं. 'अष्टपदी'च्या रूपात एक संगीतमय त्रिकोणी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी 'अष्टपदी' या वेगळ्या विषायावर आधारलेल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'अष्टपदी'च्या दिग्दर्शनाची जबाबदारी उत्कर्ष जैन स्वत: सांभाळणार आहेत. जुहू येथील आजीवासन स्टुडिओमध्ये गणेशगीताच्या ध्वनीमुद्रणाने या चित्रपटाचा मुहूर्त आणि घोषणा करण्यात आली. गीतकार गणेश चेऊलकर यांनी लिहिलेलं 'तू सुखकर्ता विघ्नहर्ता दे स्वरदान गणपती...' हे गाणं ध्वनीमुद्रित करण्यात आलं अहे. मृण्मयी फाटक आणि अभिजीत कोसंबी यांच्या आवाजातील या गाण्याला मिलिंद मोरे यांचं संगीत लाभलं आहे. 


गीत ध्वनीमुद्रण अवधूत वाडकर यांनी केलं आहे. या चित्रपटाबाबत उत्कर्ष जैन म्हणाले की, चित्रपटाची कथा 'अष्टपदी'चा खरा हिरो आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक संगीतमय त्रिकोणी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. प्रेमकथेला साजेशी श्रवणीय संगीताची किनार जोडण्याचं सुरेख काम मिलिंद मोरे यांनी केलं आहे. 'अष्टपदी'च्या पटकथेत प्रेमाचे आजवर कधीही न उलगडलेले पैलू पाहायला मिळणार आहेत. या निमित्ताने कलाकारांची तगडी फळी प्रेक्षकांचं मनोरंजन करणार असून, दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि नेत्रसुखद सादरीकरण प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरेल अशी आशाही उत्कर्ष यांनी व्यक्त केली आहे.


'अष्टपदी'च्या कलाकारांच्या निवडीची प्रक्रिया सध्या सुरू असून, त्यानंतर लगेच चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. महेंद्र पाटील यांनी 'अष्टपदी'ची कथा, पटकथा, संवाद लिहिले आहेत. महेंद्र पाटील या चित्रपटाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक असून, कला दिग्दर्शक निलेश रसाळ आहेत. डिओपी धनराज वाघ सिनेमॅटोग्राफी करणार आहेत. चित्रपटातील गीतांना संगीत देण्यासोबतच पार्श्वसंगीताची जबाबदारीही मिलिंद मोरे यांनी सांभाळली आहे. मेकअप अतुल शिधये करणार असून, अजय खाडे कार्यकारी निर्मात्याचं काम पाहणार आहेत. राहुल पाटील आणि नंदू आचरेकर या चित्रपटाचे सहदिग्दर्शक आहेत.