मुंबई : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियावर तो अनेकदा विविध विषयांवर प्रतिक्रियाही देत असतो. नुकतंच अक्षयने देशाच्या वीर जवानांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुरक्षा रक्षकांनी गाण्याद्वारे एक संदेशच दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमारने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत, 'या हृद्यस्पर्शी व्हिडिओने माझा दिवस बनवला आहे. तुम्ही आणखी काय मागू शकता? आपल्या भारताच्या सैनिकांना सलाम' असं म्हणत त्याने देशातील जवानांप्रती असलेला आदर व्यक्त केला आहे.



या व्हिडिओतील जवानांच्या देशाप्रती असलेल्या भावना आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य, हे त्या गाण्यांच्या ओळीच सर्व काही सांगून जातात. यातून जवानांचं धैर्यचं नाही तर त्यांचं देशासाठी असलेलं प्रेमही व्यक्त होत आहे.


अक्षय शेअर केलेल्या व्हिडिओला काही वेळातच लाखहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. 


आज देशभरात २०वा कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. कारगिल युद्धातील भीमपराक्रमाला आज २० वर्ष पूर्ण झाली आहेत. कारगिल विजयाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी २६ जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. १९९९ साली कारगिल युद्ध जवळपास ६० दिवसांपर्यंत सुरू होतं. २६ जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. 


भारतीय सेना आणि पाकिस्तानच्या सेनेत हिमालयाच्या टेकड्यांवरून युद्ध झालं. त्यामुळे दोन्ही देशाच्या सैनिकांना लढण्यासाठी अनेक कठिण परिस्थितीचा सामना करावा लागला. पाकिस्तानी घुसखोरांना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या या कारवाईत भारताच्या ५२७ जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तर जवळपास १३६३ जवान जखमी झाले.


दुसरीकडे, या युद्धात पाकिस्तानचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले. अखेर, २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानला कारगिलच्या टेकड्यांवरून परास्त करत तिरंगा फडकावला होता.