मुंबई : गेली अनेक वर्षे अभिनय विश्वात आपलं वर्चस्व सिद्ध करणाऱ्या आणि महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता अमिताभ बच्चन यांनी एक महत्त्वाचा उलगडा केला आहे. एका कार्यक्रमाच्या मंचावर त्यांनी आपल्या दिल्लीतील महाविद्यालयीन दिवसांची एक आठवण सर्वांसमोर ठेवली. बिग बींनी शेअर केलेली ही आठवण पाहता सर्वांना प्रथमत: धक्काच बसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मी तीन मूर्ती परिसरात राहायचो आणि नेहमीच्या प्रवासाठी बस सेवेचा वापर करायचो. ही बस संसद, कनॉट प्लेस अशा भागांतून जाऊन मग पुढे मला माझ्या ठिकाणी सोडत असे. तेव्हा या वाटेत कनॉट प्लेस थांब्यापासून मिरांडा हाऊस, आयपी कॉलेज येथील काही सुंदर मुली बसमध्ये चढत असत. त्यामुळे हा स्टॉप टेऊन त्या कधी एकदा बसमध्ये चढतात याचीच आम्ही वाट पाहत असायचो', असं बिग बी म्हणाले. 


बच्चन यांनी ही आठवण सांगण्यास सुरुवात करताच अनेकांना धक्का बसला. पुढे याचविषयी सांगत ते म्हणाले, 'पुढे काही वर्षांनी पदवीधर झाल्यानंतर मला नोकरी मिळाली. तेव्हाच आमच्या त्या बसमधून प्रवास करणाऱ्या सुंदर मुलींपैकी एक मुलगी मला भेटली. त्यावेळी एक बाब लक्षात आली की, तिच्याकडेही सांगण्यासाठी खूप गोष्टी होत्या.'


त्या मुलीच्या सांगण्यानुसार ती आणि तिच्या मैत्रीणी अमिताभ बच्चन त्या बसमधून कधी येणार याची वाट पाहत असत. ती त्या बस थांब्यावर तिच्या प्राण नावाच्या एका मित्रासोबत बस येण्याची वाट पाहत असे, असंही बिग बींनी ही आठवण शेअर करताना सांगितलं. जेव्हा जेव्हा बस यायची तेव्हा तेव्हा तिच्या मनात एकच विचार यायचा, प्राण (तिचा मित्र) जाए पर, बच्चन ना जाए.....' महाविद्यालयीन दिवसांमध्ये घडलेल्या अनेक गोष्टी या प्रत्येकासाठीच खास असतात. आठवणींच्या याच गाठोड्यातून बिग बींनी सर्वांसमोर आणलेला हा किस्सा नक्कीच चाहत्यांमध्ये गाजणार यात शंका नाही.