मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट ही तिच्या आगामी चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यालाही तितकंच प्राधान्य देत आहे. अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या आलियाने कायमच या नात्याविषयी अगदी खुलेपणाने आणि तितक्याच आपुलकीने वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं आहे. याच नात्यामुळे विशेष म्हणजे रणबीरमुळे आलियाला तिच्या कारकिर्दीतील कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याचा धीर मिळाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कलंक' या चित्रपटाच्या वाट्याला आलेल्या अपयशानंतर आलियाने या परिस्थितीचा कसा सामना केला? असा प्रश्व विचारला असता तिने या प्रश्वाचं उत्तर देत या काळात आपल्याला रणबीरने अतिशय मोलाचा सल्ला दिल्याचं सांगितलं. निर्माता- दिग्दर्शक करण जोहर याच्याशी 'जिओ मामी मुव्ही मेला विथ स्टार्स २०१९' या सत्रात ती बोलत होती. 


चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधीच आपण तो पाहिल्याचं म्हणत आलियाने पुढे जाऊन या साऱ्याला नेमका कसा प्रतिसाद मिळेल याची कल्पना असल्याचं स्पष्ट केलं. मुळात अपयशाचा सामना करावा लागेल याची कल्पना होती, पण इतक्या मोठ्या प्रमामात या चित्रपटाला नापसंती दर्शवण्यात येईल हे अनपेक्षित होतं. ज्या गोष्टींसाठी तुम्ही सर्वस्व पणाला लावला, ज्या सर्वस्वाच्या बळावर काहीतरी चांगलं घडण्याची अपेक्षा असते तेव्हाच अगदी उलट घडतं जे हादरवणारं असतं असं म्हणत आलियाने तिची त्या क्षणाची मनस्थिती सर्वांसमोर ठेवली. 


एकिकडे आलिया अपयशाने खचलेली असतानाच रणबीरने तिला आधार दिला. कोणत्याही गोष्टीसाठी घेतलेली मेहनत, त्या गोष्टीसाठीचे कष्ट या साऱ्याची परतफेड ही लगेचच होईल असं नाही. एखाद्या दिवशी, केव्हातरी हे यश तुमच्या वाट्याला येईल असा विचार असावा. मेहनती असण्याची हीच ती लक्षणं..... एखाद्या दिवशी दुसऱ्याच एका चित्रपटाच्या रुपात तुझ्या वाट्याला हे यश येईल, असं रणबीर आलियाला म्हणाला होता. तिच्यासाठी त्याचा हा सल्ला अतिशय मोलाचा होताच. शिवाय अपयशाच्या त्या प्रसंगात हाच सल्ला तिच्यासाठी आधार सिद्ध झाला होता.