मुंबई : परखडपणे मतप्रदर्शन करण्यासाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौत हिच्या टीकेला आलिया भट्टने अगदी 'समंजस' शब्दांत उत्तर दिलं आहे. देशात सद्यस्थितीला सुरु असणाऱ्या घडामोडी आणि राजकारण या विषयांवर आपली मतं न मांडणाऱ्या आलियाचा उल्लेख कंगनाने बेजबाबदार असा केला होता. अखेर कंगनाच्या या टीकेवर आलियाने उत्तर दिलं आहे. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपलीही काही मतं असून, ही मतं स्वत:पुरताच सीमीत ठेवणं योग्य समजत असल्याचं आलियाने स्पष्ट केलं. सोबतच कंगनाच्या वक्तव्यालाही तिने दुजोरा दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मी कंगनाइतकी परखडपणे मतं मांडू शकत नाही. मी यासाठी खरंच तिचा फार आदर करते. एका अर्थी तिचं म्हणणं अगदी योग्यच आहे. अनेकदा आम्ही व्यक्त होत नाही. माझे वडिलही म्हणतात की, आधीच अनेकांनीच आपली मतं मांडली आहेत. त्यामुळे कोणी एकाने मतप्रदर्शन केलं नाही तर त्याने फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे इथे मी सांगू इच्छिते की अर्थात माझीही मतं आहेत. पण, ती मतं माझ्यापुरतीच सीमीत आहेत', असं आलिया म्हणाली. कंगनाच्या वक्तव्याची तिने दादही दिली. ज्या सच्चेपणाने तिने मत मांडलं ते प्रशंसनीय असल्याचं आलियाने स्पष्ट केलं. 


एकिकडे देशात सध्याच्या परिस्थितीला सुरु असणारं वातावरण आणि त्यावर अनेकजणांच्या प्रतिक्रिया पाहता आलियाने मात्र या साऱ्यापासून स्वत:ला दूर ठेवणंच जास्त उत्तम समजलं आहे. त्यामुले आलियानेही क्वीन कंगनाच्या प्रश्नाला अगदी समंजस आणि तितक्याच थेट शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.