मुंबई : सेलिब्रिटी वर्तुळामध्ये कलाकारांची नाती आकारास येण्यापासून त्या नात्यांमध्ये येणारे आव्हानाचे प्रसंग अनेकदा सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरतात. त्यात एखाद्या लोकप्रिय सेलिब्रिटी खासगी आयुष्यामध्ये आलेला तणाव कित्येकदा बऱ्याच नव्या चर्चांना तोंड फोडूनही जातो. एका बॉलिवूड अभिनेत्रीला अशाच परिस्थितीचा सामना करवा लागला होता. ज्याविषयी अखेर तिने खुलेपणाने काही गोष्टींवरुन पडदा उचलला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पती, साहिल संघा याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर समाजाकडून तिला कशा प्रकारे वागणूक दिली गेली याचा खुलासा दियाने केला. 'तुम्हाला कोणत्या गोष्टीकडन धैर्य आणि ताकद मिळत असेल तर ती गोष्ट म्हणजे तुम्ही स्वत:. असं न झाल्यास तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या गोष्टी तुम्ही समजूनच घेऊ शकणार नाही. त्यावेळी तुम्ही फक्त समाजाशीच नव्हे, तर स्वत:शीसुद्धा प्रामाणिक नसाल', असं दिया म्हणाली. 


घटस्फोटानंतर इतरांची आपल्याप्रती असणारी वागणूक नेमकी कशी बदलत गेली याविषयी आजही विचार केल्यास दियाला धक्काच बसतो. याचविषयी सांगत ती म्हणाली, 'मला तेव्हा (इतरांची वागणूक पाहून) धक्काच बसला. आताही कधीकधी मला याचा विचार केल्यास धक्का बसतो. तुम्ही एका अशा सुशिक्षित वर्तुळात असता जेथे तुम्हाला खोटा दिलासा दिला जातो. एका अशा प्रसंगी तुम्हाला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला जातो जेव्हा तुम्ही सर्वाधिक दु:खी असता. हा पाठिंबा एक प्रकारचा दिखावा असतो. कित्येकदा मी इतकी खंबीर कशी, अशा प्रसंगी मी काम करण्यासाठी कशी बाहेर पडते? असे प्रश्न मला विचारले जातात.'



घटस्फोटानंतरच्या काळात दियाला सर्रास विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं देत, मी माझी वाट शोधत आहे आणि मी आशा करते की तुम्हालाही तुमची वाट गवसेल; इतकंच म्हणत ती व्यक्त व्हायची. अनेकदा घटस्फोटाच्या मुद्द्यावरुन समाजाचा विचारही करावा लागतो, असंही तिने सांगितलं. घटस्फोटाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असल्याचं म्हणत अनोळखी व्यक्ती, मित्रपरिवार, आईवडिल यांचं उदाहरण तिने दिलं. अशा वेळी या सर्वांकडून एकच अपेक्षा असल्याचं स्पष्ट करत यांच्याकडून आपल्या निर्णयाची आणि खासगी जीवनातील काही प्रसंगांची स्वीकारार्हता अपेक्षित असल्याचं ती म्हणाली. 



दोन व्यक्ती जेव्हा परस्पर सामंजस्याने अमुक एका नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतात, तेव्हा या व्यक्तींच्या निर्णयाचा आदर केला गेला पाहिजे अशी माफक अपेक्षा तिने व्यक्त केली. २०१४ मध्ये दियाने साहिल संघासोबत लग्नगाठ बांधली होती. कालांतराने त्यांच्या या नात्यात दुरावा आला आणि अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.