मुंबई : वादग्रस्त विधानं आणि ट्विट्स मुळे नेहमीच चर्चेत असणारा अभिनेता कमाल राशिद खान याने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटद्वारे त्याने बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. अक्षयच्या आगामी चित्रपटावरून कमालने ही टीका केली आहे. या टीकेला आता अक्षय कुमार काय उत्तर देतोय, हे पहावं लागेल.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. मानुषी छिल्लर, संजय दत्त आणि सोनू सूद या कलाकारांनी देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. येत्या  3 जून 2022 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


कमाल खानने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, 'अनेक लोकांनी माझ्या  व्हिडीओवर कमेंट करून सांगितले, संजय दत्त पृथ्वीराज सिनेमात मोहम्मद घोरीच्या भूमिकेत नाही. त्यापेक्षा सोनू आणि संजू पृथ्वीराजला मदत करतात. याचा अर्थ चित्रपटात एकही ताकदीचा खलनायक नाही. त्यामुळे हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी खाली पडेल, अशी टीका कमालने केली आहे. अभिनंदन अक्षय कुमार, असेही पुढे त्याने म्हटले आहे. 


कमाल खानने युट्यूब व्हिडीओवर शेअर केलेल्या ट्रेलर रिव्ह्यूमध्ये म्हटले, 'पानिपत' आणि 'पृथ्वीराज'मध्ये काहीचं फरक नाही. पानिपतमध्ये अर्जुन कपूरच्या जागी अक्षय कुमारला आणल्याचे दिसते. पृथ्वीराज 26 वर्षांचा होता तर अक्षय कुमार 60 वर्षांचा आहे, त्यामुळे प्रेक्षक ते स्वीकारतील असे वाटत नाही. हा चित्रपट फ्लॉप ठरेल असेही तो म्हणाला.