बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) समाजातील पुरुषप्रधान संस्कृती दाखवणाऱ्या बॉलिवूडमधील यशस्वी चित्रपटांवर टीका केली आहे. आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत तिने रणबीर कपूरच्या (Ranbir Kappor) अ‍ॅनिमल (Animal) चित्रपटातील हिंसाचारावर टीका केली आहे. गतवर्षी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला होता. या चित्रपटात रणबीर कपूर गँगस्टरच्या भूमिकेत असून, प्रचंड हिंसाचार दाखवण्यात आला आहे. 


कंगनाने काय म्हटलं आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे पितृसत्ताक चित्रपट तुम्ही पाहा. हे चित्रपट पाहताना टाळ्या आणि शिट्या वाजवणारे लोक नेमके कोण असतात असा प्रश्न मला पडतो. मुलं कुऱ्हाडी घेऊन घराबाहेर पडत आहेत आणि रक्तपात, हिंसाचारात सहभागी होत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था जणू काही नाहीच आहे. पोलीस नसल्याप्रमाणे ते शाळेत मशीन गन घेऊन घुसतात. जणू काही त्याचे परिणामच होणार नाहीत. जणू काही कायदा आणि सुव्यवस्था मेली आहे. मृतदेहांचे खतच पडले आहेत. पण का? फक्त मजेसाठी. लोककल्याण किंवा सीमेचं रक्षण करत नाही आहेत. फक्त ड्रग्ज घेऊन मजा करत आहेत," अशी टीका कंगनाने केली आहे. 


कंगनाने याआधीही अ‍ॅनिमल चित्रपटावर टीका केली होती. संदीप रेड्डी वांगाने आपल्याला कंगनासह काम करण्यास आवडेल असं म्हटलं होतं. त्यावर कंगाने त्याची ऑफर जाहीरपणे नाकारली होती. ती म्हणाली होती की, "कृपया मला अशी कोणतीही भूमिका देऊ नका अन्यथा तुमचे अल्फा पुरुष नायक स्त्रीवादी होतील आणि मग तुमचे चित्रपटही मारले जातील, तुम्ही ब्लॉकबस्टर बनवा, चित्रपटसृष्टीला तुमची गरज आहे". 


कंगना आता इमर्जन्सी चित्रपटात झळकणार आहे. 6 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 


शेतकरी आंदोलनावरुन केलेल्या विधानावरुन वाद


कंगनाने नुकतंच एका मुलाखतीत शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmers Protest) बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप केला असून यामुळे वाद निर्माण झाला आहे. भाजपानेही याची दखल घेत कंगनाला सुनावलं असून ही पक्षाची भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं.  


कंगना रणौतन आपल्या मुलाखतीत आरोप करताना म्हटले की, "शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला. त्याठिकाणी बलात्कार झालेत, अनेकांच्या हत्यादेखील झाल्या आहेत. केंद्र सरकारने कृषी संबंधित तीन विधेयक माघारी घेतले नसते तर देशात आणखी काही भयंकर घटना घडल्या असत्या". आपल्या देशाचे सर्वोच्च नेतृत्व मजबूत नसते, तर या लोकांनी पंजाबला बांगलादेश बनवले असते असंही ती म्हणाली.