मुंबई : भारतरत्न, गानसम्राज्ञी, स्वर सरस्वती अशी लता मंगेशकर यांची ओळख. भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सुवर्णकाळ पाहणाऱ्या त्यामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या दीदी आज आपल्यात नाहीत. दीदींचं नसणं जसं प्रत्येकाच्या आयुष्यावर फरक टाकणारं आहे, तसंच ते मन हेलावणारंही आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लता मंगेशकर यांच्या निधनाचं वृत्त कळताच त्यांच्या घराभोवती मोठी गर्दी सुरु झाली. आपलं कुणीतरी जवळचं व्यक्ती कायमचं निघून जाताना त्याला एकदा डोळे भरून पाहणं हीच भावना सर्वांच्या मनात होती.



डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या होत्या. यामध्ये एक चेहरा सातत्यानं नजरेस पडला. त्यांचा हुंदका थांबला नव्हता. वय पाहता, त्यांची इतरांना काळजीही वाटली. 


दीदीssss अशी आर्त हाक मारणारा हा चेहरा पुरता कोलमडला होता. हा चेहरा होता दीदींच्या मदतनीस, त्यांची काळजी घेणाऱ्या विमल सोनावणे यांचा. 


मागील 42 वर्षांपासून त्या दीदींची काळजी घेत होत्या. एखाद्या नाजूक गोष्टीला जपतो, तसं दीदींना हवं नको ते पाहत होत्या. 


लतादीदींच्या घराबाहेरच्या गर्दीत विमलताई त्यांच्या आठवणीनं गहिवरून आल्या होत्या. 


'त्यांनी बोलवताच काय हवं- नको ते मी पाहत होते. त्यांची खोली लावण्यापासूनचं काम करत होते. एकदा मी आणलेले लाडू दीदींनी खाल्ले ते त्यांना आवडले हे पाहून माझं मन भरून आलं', असं विमलताई म्हणाल्या. 


दीदींनी लाडू खाल्ला मला खूप बरं वाटलं.... असंच म्हणून विमलताईंनी दीदींना हाक मारली. पण, यावेळी मात्र ऐकण्यासाठी दीदी तिथे नव्हत्या. विमलताईंची सेवा इथेच संपली होती. कारण, सरस्वचीचं पृथवीवरचं अवतारकार्य संपलेलं.