मुंबई : रानू मंडल यांच्या विषयीच्या काही चर्चा कित्येक दिवसांपासून वाऱ्यासारख्या पसरत आहेत. तब्बल १० वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात सोनेरी दिवस आला आहे. पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वे स्थानकावर लता मंगेशकर यांच्या 'एक प्यार का नगमा हैं' या गाण्याने त्यांच्या नशिबाचा दरवाजा उघडला. सोशल मीडियावर साधी गोष्ट देखील काही क्षणातंच व्हायरल होते. त्याचप्रमाणे रानू यांचा आवाज देखील संपूर्ण जगात पसरला. त्यानंतर त्यांच्या बॉलिवूडच्या प्रवासाला सुरूवात झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तेरी मेरी' या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर अभिनेता सलमान खानने त्यांना तब्बल ५५ लाखांचं घर दिल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. परंतु खुद्द रानू यांनी या अफवांना पूर्णविराम दिला. त्याचप्रमाणे त्यांना 'दबंग ३' चित्रपटात गाण्याची संधी मिळाल्याच्या बातम्यांना देखील त्यांनी फेटाळले आहे. 



यासंबंधी सलमानकडे विचारणा करण्यात आल्यानंतर बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने या सर्व अफवांचे खंडन केले आहे. तो म्हणाला की, 'ही बातमी खोटी आहे. माझ्या कानावर ही बातमी आली आहे. पण मी त्यांच्यासाठी काहीही केलेले नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे श्रेय मी घेणार नाही.'


सलमान सध्या त्याच्या आगामी 'दबंग ३' चित्रपटामध्ये व्यस्त आहे. सलमानच्या या चित्रपटात अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूड डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. २० डिसेंबर रोजी 'दबंग ३' रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.