मुंबई : ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळे आज निधन झालं आहे. गेले चार दिवस ते ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
किशोर नांदलस्कर यांचे मूळ गाव खारेपाटण तालुक्यातील शेजवली येथे होतं. त्यांचा जन्म मुंबईचाच. मुंबईत लॅमिंग्टन रस्ता, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचं बालपण गेलं. 'न्यू इरा हायस्कूल' आणि 'युनियन हायस्कूल' येथे त्यांचं शालेय शिक्षण झालं. किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. त्या वातावरणातच नांदलस्कर लहानाचे मोठे झाले होते. त्यामुळे अभिनयाचं वेड त्यांना लागलेलं होतंच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदलस्कर यांनी आत्तापर्यंत सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी व हिंदी सिनेमा आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले आहे. 'नाना करते प्यार' हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम केलेले शेवटचे नाटक. 'सारे सज्जन', 'शेजारी शेजारी', 'हळद रुसली कुंकू हसले' आणि इतर काही चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत. 'विच्छा माझी पुरी करा' हे नाटक नव्याने पुन्हा रंगभूमीवर सादर झालं. त्याचं दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांचं होतं. या नाटकातील 'राजा'ची भूमिका तसेच दिलीप प्रभावळकर यांनी लोकप्रिय केलेले 'वासूची सासू' हे नाटकही नव्याने रंगभूमीवर सादर झालं. यात प्रभावळकर यांची भूमिका नांदलस्कर यांना साकारायची संधी मिळाली. दोन्ही भूमिका नांदलस्कर यांनी खास त्यांच्या शैलीत सादर केल्या. व्यावसायिक रंगभूमीवर नांदलस्कर यांनी 'चल आटप लवकर', 'भ्रमाचा भोपळा', 'पाहुणा', 'श्रीमान श्रीमती', 'भोळे डॅम्बीस', 'वन रूम किचन' आदी नाटकांमधून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं.


महेश मांजरेकर यांच्या 'वास्तव' चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. 'जिस देश में गंगा रहता है', 'तेरा मेरा साथ है', 'खाकी'अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ,चाल जाए पर वचन न जाए,' 'ये तेरा घर ये मेरा घर', 'हलचल', 'सिंघम' या हिंदी चित्रपटांतही त्यांच्या भूमिका होत्या. 


त्यांच्या कुटुंबात पत्नी लक्ष्मी आणि तीन विवाहित मुलं आहेत, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. २०१६मध्ये त्यांना शारीरिक त्रास सुरू झाला. नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये व्यग्र असलेल्या नांदलस्कर यांनी त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं. वैद्यकीय तपासण्यातून हृदयविकार, मधुमेह असल्याचे समोर आलं होत.  त्यांची ‘बायपास’ झाली होती मात्र यातुनही ते सावरले होते मात्र कोरोनामुळे त्यांच आज निधन झालं.