मुंबई : रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्याप्रमाणेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दोघंही त्यांच्या नात्याला आता एक नवं वळण देणार असल्याचं म्हणत इटलीतील लेक कोमो येथे ते विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण, खुद्द आलियाच्या आईनेच या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 'आयएएनएस' या वृत्तसंस्थेशी संवाद साधत त्यांनी याविषयीच्या काही गोष्टी स्पष्ट केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दूरध्वनीवर देण्यात आलेल्या मुलाखतीत त्यांनी आलिया- रणबीरच्या लग्नाच्या चर्चा म्हणजे निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं. संपूर्ण कलाविश्वात आलिया आणि रणबीरच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच ते दोघं सध्याचा व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत युरोपमध्ये सुट्टीचा आनंद घेत असल्याचंही म्हटलं जात आहे. आलियाच्या हाताशी तीन चित्रपट आहेत, तर रणबीरही त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात करणार आहे. बी- टाऊनची ही बहुचर्चित जोडी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातूनही झळकणार आहे, पण, तुर्तास त्या दोघांकडूनही त्यांच्या नात्यात येणाऱ्या नव्या वळणाविषयी फार काही सांगण्यात आलेलं नाही. त्यातही आता आलियाची आई, म्हणजेच सोनी राजदान यांनी एक लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. 


'चाहते त्यांच्या खासगी आयुष्याविषयीच्या काही गोष्टी आपलेपणाने विचारतात ही खूप आनंदाची बाब आहे. पण, मी आलियाची आई आहे आणि तिच्या खासगी आयुष्याविषयी खरंच काहीही वक्तव्य करायचं नाही आहे. ती आनंदात रहावी हीच माझी इच्छा आहे आणि माझा आशिर्वाद कायमच तिच्यासोबत आहे', असं त्या म्हणाल्या. आलिया ही अतिशय संवेदनशील व्यक्तीमत्वाची मुलगी असून ती योग्य ते निर्णय घेऊ शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे सध्यातरी आलिया आणि रणबीरच्या लग्नाविषयीच्या या अफवा शमतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.