मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा पोस्टमॉर्टमचा अंतिम रिपोर्ट समोर आला आहे. गळफास लावल्यामुळेच सुशांतचा मृत्यू झाल्याचं कारण या रिपोर्टमध्ये मांडण्यात आलं आहे. ५ डॉक्टरांच्या टीमने अंतिम पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवला आहे. सुशांतचा अंतिम पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला असला, तरी त्याचा विसरा रिपोर्ट अजूनही आलेला नाही. मुंबई पोलिसांनी डीजी फॉरेन्सिक यांना विसरा रिपोर्ट देण्यासाठी पत्रही लिहिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार सुशांत सिंग राजपूतला गळा दाबून मारण्यात आलं का, असेही सवाल उपस्थित होत होते, पण याबाबतच्या चौकशीत असं काहीही समोर आलेलं नाही. सुशांतच्या शरिरावरही कोणत्याही खुणा दिसल्या नाहीत, तसंच त्याच्या नखांमधूनही काहीही मिळालेलं नाही. मुंबई पोलिसांनी आजच सुशांतच्या सीएचा जबाब घेतला आहे. सुशांतच्या डॉक्टरांचा जबाब मात्र अजून घेण्यात आलेला नाही. 


सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी २३ जणांचा जबाब नोंदवला आहे. २०१२ साली सुशांतने यशराज फिल्म्ससोबत करार केला होता. तर चित्रपटाबाबत सुशांत सिंगची शेवटची चर्चा त्याचा मॅनेजर उदय सिंग गौरी याच्याशी झाल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे. 


१४ जूनला सुशांत सिंग राजपूतने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस त्याचे मित्र, नोकर आणि नातेवाईकांची चौकशी करत आहेत.