मुंबई: असभ्य वर्तन केल्याचा आरोप करत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांना चांगलच अडचणीत आणलं. 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेला एक प्रसंग तनुश्रीने एका मुलाखतीत उघड केला आणि संपूर्ण कलाविश्वात एकच खळबळ माजली. ज्यानंतर अनेकांनीच तनुश्रीला पाठिंबा दिला. ज्यामध्ये अभिनेत्री ट्विंकल खन्ना, फरहान अख्तर, सोनम कपूर यांच्या नावाचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चर्चेत असणाऱ्या याच मुद्द्यावर आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


'कोण, कोणाला कधी आणि काय म्हणालं, त्या बाबतीत मला काहीच माहित नाही. पण, ज्यावेळी मुद्दा हा महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा आणि त्यांना होणाऱ्या त्रासाचा असतो तेव्हा मात्र महिलांनी सर्वांसमोर त्याविषयी खुलासा करावा जेणेकरुन दुष्कृत्य करणाऱ्यांची सहजासहजी सुटका मिळणार नाही', असं त्या म्हणाल्या. 


कित्येक वर्षांपासून महिलांवर अत्याचार होत आहेत. आधीपासूनच महिलांना चूल- मुल इथवरच सीमीत राहावं लागत होतं. पण, आता मात्र या साऱ्या कोषातून बाहेर येत महिला पुढे जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं. 


महिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांविषयी मौन पाळता कामा नये, हाच मुद्दा आशाताईंनी अधोरेखित केला. 


नाना पाटेकर यांच्या स्वभावाविषयी आणि त्यांनी आपल्याला दिलेल्या वर्तणूकीविषयी तनुश्रीने केलेलं वक्तव्य पाहता बऱ्याचं चर्चांनी डोकं वर काढलं आहे. 


दरदिवसाआड नवं वळण मिळणाऱ्या या प्रकरणाला आता पूर्णविराम कधी मिळणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.