नवी दिल्ली : सर्वाधीक लठ्ठ मुलांच्या संख्येत भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्राप्त माहितीनुसार भारतात सुमारे १.४४ कोटी मुले ही अधिक वजनाची आहेत. लठ्ठपणा हा अनेक अजारांचे प्रमुख कारण ठरतो. महत्त्वाचे असे की जगभरातील तब्बल दोन अरब इतक्या संख्येची मुले आणि ज्येष्ठ नागरिक लठ्ठपणामुळे हैराण आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लठ्ठपणाच्या बाबतीत चीन पहिल्या तर, भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. बॉडी मास इंडेस्क अर्थात बीएमआयनुसार लठ्ठपणा मोजला जातो. ८५ ते ९५ टक्क्यांपर्यंत बीएमआय असणारी मुले लठ्ठ या विभागात येतात. अतीवजन किंवा लठ्ठपणा असलेल्या मुलांना हृदयविकार किंवा मधुमेहाची शिकार ठरण्याची शक्यता असते.


इंडियन मेडिकल असोशिएशन (आयएमए) चे अध्यक्ष पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांनी म्हटले आहे की, 'लठ्ठपणाची समस्या केवळ भारतच नव्हे तर, जगभरात वाढती आहे. त्यात लहान मुलांमध्ये लठ्ठपणा अधिक प्रमाणात वाढताना दिसत आहे. वेळी अवेळी जेवण, चुकीचा अहार, शरीराला योग्य प्रमाणात आवश्यक त्या प्रथिनांचा पुरवठा न होणे, खाण्यात सतत जंकफूड्स येणे, व्यायामाचा आभाव आदी गोष्टींमुळे लठ्ठपणा मोठ्या प्रमाणावर वाढतो. काही बालकांमध्ये लठ्ठपणा हा अनुवंशीकही असतो', असेही अग्रवाल यांनी सांगितले.


सातत्याने एकाजागी बसून टीव्ही पाहाने, कॉम्प्यूटर, मोबाईलवर गेम खेळणे. मैदानी खेळांकडे बालक आणि पालकांचेही दुर्लक्ष होणे यांमुळेही मोठ्या प्रमाणावर लठ्ठपणा वाढतो. लहानपणी अधिक वजन वाढल्यास मोठेपणी टाईप १ किंवा टाईप २ प्रकारचा मधुमेह होण्याचा धोका वाढतो. तसेच, डिस्लेपिडाइमिया, मेटाबोलिक सिंड्रोम आदि गोष्टीही लठ्ठपणामुळे वाढतो, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.