Dengue Prevention : भारतातील अनेक शहरांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. जगभरात हा आकडा झपाट्याने वाढत असून डेंग्युची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वर्षानुवर्षे सातत्याने वाढत आहे. या धोकादायक आजाराबद्दल आणि तो कसा पसरतो याबद्दल जाणून घेऊया. तसेच डेंग्यूच्या रुग्णांच्या वाढीची परिस्थिती काय आहे आणि ते रोखण्यासाठी कोणती पावले उचलली जाऊ शकतात.   


डेंग्युची लक्षणे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेंग्यू हा एडिस इजिप्ती डासामुळे पसरणारा विषाणूजन्य संसर्ग आहे. संसर्ग झालेल्या बहुतेक लोकांमध्ये सौम्य लक्षणे असतात, परंतु या आजारामुळे ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ आणि उलट्या, डोळ्यांच्या मागे दुखणे आणि पुरळ उठू शकते. डेंग्युच्या गंभीर प्रकरणांमध्ये संसर्गामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो आणि वेळेवर योग्य उपचार न केल्यास मृत्यू देखील होऊ शकतो.


गेल्या दोन दशांकमध्ये डेंग्युच्या रुग्णांमध्ये दहापटीने वाढ झाली आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या रुग्णांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. यामुळे अनेक रुग्णांचे मृत्यू देखील होत आहे. 


यावर्षी किती लोकांना डेंग्युची लागण? 


वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या माहितीनुसार, या वर्षी ऑगस्टपर्यंत जगभरात 12 दशलक्षाहून अधिक प्रकरणे आणि 6,991 मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी नोंदवलेल्या 5.27 दशलक्ष प्रकरणांपेक्षा हे दुप्पट आहे, हा एक विक्रम आहे. गेल्या दशकात, 2023 पूर्वी, डेंग्यूच्या सुमारे 2 ते 3 दशलक्ष वार्षिक रुग्णांची नोंद झाली होती.


तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या 2024 ची विक्रमी संख्या देखील कमी होण्याची शक्यता आहे. कारण भारतासह अनेक देश त्यांच्या डेटाचा अहवाल जागतिक मॉनिटरिंग नेटवर्कला देत नाहीत. डेटाचा अहवाल देणाऱ्या देशांमध्येही, डेंग्यूच्या प्रत्येक रुग्णाची चाचणी झाली नसावी. तसेच, हे आरोग्य अधिकाऱ्यांना कळवलेले नसावे.


भारतात डेंग्यूच्या रुग्णांची स्थिती काय आहे?


गेल्या दोन महिन्यांपासून अनेक शहरांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नॅशनल वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामच्या ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार, जून अखेरीस डेंग्यूचे 32 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आणि ३२ जणांचा मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यांत ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले होते की 2023 च्या याच कालावधीच्या तुलनेत यावर्षी भारतात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या सुमारे 50 टक्क्यांनी वाढली आहे. महत्त्वाचं म्हणजे, भारतातील संसर्गाच्या भौगोलिक स्थितीतही वाढ होत आहे. हा रोग 2001 मध्ये फक्त आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपासून 2022 मध्ये प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात पसरला. लडाखमध्येही 2022 मध्ये प्रथमच दोन प्रकरणे नोंदवली गेली.