Assam Meghalaya Border Conflict : आसाम (Assam) आणि मेघालय (Meghalaya) यांच्यात पाच दशकांपासून सुरू असलेला सीमावाद काही केल्या संपत नाहीये. मार्चमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थित दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत तोडगा काढण्यात आला होता. 12 पैकी सहा वादग्रस्त जागांबाबत दोन्ही राज्यांनी एकमत करत अमित शाह यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. यावेळी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे शाह यांनी म्हटले होते. मात्र आता पुन्हा एकदा दोन्ही राज्यांतील वाद उफाळून आलाय. आसामच्या वनरक्षकांनी (Assam Forest Guard)केलेल्या गोळीबारात मेघालयातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आसाम आणि मेघालयमध्ये पुन्हा एका तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. (assam meghalaya border dispute)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेघालयातील पश्चिम जयंतिया हिल्सच्या मुक्रोह गावात ही घटना घडली. पाच जणांच्या मृत्यूनंतर तणाव पसरला असून 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद (internet off) ठेवण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता काही गावकरी छोट्या ट्रकमध्ये लाकडे भरून जंगलातून परतत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आसामच्या वनरक्षकांनी ज्या भागात गोळीबार केला तो भागही मेघालयचाच आहे. या क्षेत्राबाबत अद्याप आसाम आणि मेघालयमध्ये वाद सुरू आहे. 



"या घटनेत मेघालयातील पाच आणि आसामच्या एका वनरक्षकासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. जखमींनी तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. मेघालय पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी केली आहे," असे मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी म्हटले आहे.


दुसरीकडे, पश्चिम कार्बी आंगलांगचे पोलीस अधीक्षक इमदाद अली म्हणाले की, आसाम वन विभागाच्या पथकाने पहाटे तीनच्या सुमारास मेघालय सीमेवर एक ट्रक अडवला. ट्रक पळून जाण्याचा प्रयत्न करताच वनविभागाने गोळीबार केला. त्यामुळे ट्रकचा टायर पंक्चर झाला. यावेळी चालकासह तिघांना पकडण्यात आले तर इतर पळून जाण्यात यशस्वी झाले.