नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे धोकादायक ठिकाण झालेल्या वुहानमधील (चीन) भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज दिल्लीतून एअर इंडियाचे विशेष विमान वुहानच्या रवाना होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वुहानमध्ये असलेल्या भारतीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या वुहान विद्यापीठात मोठ्याप्रमाणावर भारतीय विद्यार्थी शिकायला आहेत. या विद्यार्थ्यांना विमानमार्गे थेट भारतात आणण्यासाठी भारतीय परराष्ट्रमंत्रालयाने चीनची परवानगी मागितली होती. कोरोना व्हायरस सध्या चीनमध्ये थैमान घालत आहे. आतापर्यंत या व्हायरसची लागण होऊन २१३ जणांचा बळी गेला आहे. तर तब्बल सात हजार लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे.


कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी खास उपाय


या व्हायरसने भारतामध्येही शिरकाव केला आहे. कालच केरळमध्ये कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली होती. यानंतर चीनमधून उत्तराखंडच्या ऋषीकेशमध्ये परतलेल्या एका तरुणीलाही कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. ही मेडिकलची विद्यार्थिनी आहे. तिचे सॅम्पल्स पुण्यातल्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. 



कोरोना व्हायरसच्या धास्तीमुळे जगभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चीनमधील वुहान हे शहर कोरोना व्हायरसचे केंद्र झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे भारतात तयार करण्यात येणाऱ्या एन-९५ मास्कची मागणी प्रचंड वाढली आहे. परिणामी तामिळनाडूच्या मुदरै येथील कारखान्यांमध्ये कामगारांना जास्त वेळ काम करावे लागत आहे.