नवी दिल्ली : विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. वाढत्या महागाईत आता आणखी एक खिशाला कात्री लागणार आहे. विमान प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते. विमान तिकीटाचे दर वाढवण्याचा विचार सुरू आहे. साधारण 300 ते 600 रुपयांपर्यंत तिकीटाचे दर वाढण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनानंतर तिकीटाचे दर दुप्पट वाढले आहेत. त्यामध्ये आता महागाईमुळे पुन्हा दरवाढ झाली तर तो प्रवाशांना मोठा फटका असेल. यामुळे प्रवासी संख्येत मोठी घट होण्याचीही शक्यता आहे. 


एअरलाइंन्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एविएशन टरबाइन फ्लूल ATF च्या किंमती वाढल्या तर तिकीट वाढवण्याशिवाय कोणताही पर्याय नसेल.  2 ते 4 महिन्यात तिकीट वाढवलं जाऊ शकतं. एकदम तिकीटाचे दर न वाढवता टप्प्या टप्प्याने तिकीटाचे दर वाढवण्यावर विचार सुरू आहे. 


देशांतर्गत तिकीटाचे दर 30 टक्क्यांनी वाढले आहेत. आता जर फ्यूलचे दर चढे राहिले तर मात्र तिकीटाचे दर 300 ते 600 रुपयांनी वाढवण्यात येऊ शकतात. 


स्पाइसजेटच्या म्हणण्यानुसार तिकीटाचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढवणं गरजेचं आहे. यामागे फ्यूलसोबतच रुपयाची घसरणं हे देखील कारण सांगितलं आहे. सध्याची स्थिती एअरलाइन्स आणि प्रवासी दोघांसाठी चांगली नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावं असंही म्हटलं आहे.


दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. पेट्रोल-डिझेल, सोनं-चांदीसोबत अत्यावश्यक सेवांचे दर वाढत आहेत. आता प्रवासखर्चही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ पोहोचत आहे. आता त्यात विमानप्रवास महागला तर प्रवासी संख्या कमी होऊन त्याचा विमान कंपन्यांनाच तोटा होऊ शकतो. त्यामुळे यावर सुवर्णमध्य काय निघणार ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.