मुंबई : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान एका पाठोपाठ एक अनेक मोठे निर्णय घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब पोलिसांनी सुमारे 184 माजी मंत्री आणि माजी आमदारांची सुरक्षा काढून घेण्याचे आदेश जारी केले आहेत. या व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी 300 हून अधिक जवान तैनात करण्यात आले होते. हे आदेश एडीजीपींनी सर्व पोलीस प्रमुखांना पाठवले आहेत.


आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन झाल्यानंतर दुसऱ्यांदा सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या माघारीची यादी जारी करण्यात आली आहे. यावेळी ज्या लोकांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे त्यात डझनभर माजी मंत्री आणि माजी खासदारांचा समावेश आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेखाली तैनात असलेले कर्मचारी, माजी आयपीएस अधिकाऱ्यांच्या सुरक्षेखाली तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनाही परत बोलावण्यात आले आहे.


अनेक माजी सभापतींच्या सुरक्षेत तैनात असलेली सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे. मार्च महिन्यातही व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या ४०० हून अधिक विविध बटालियन आणि कमांडो फोर्सचे जवान मागे घेण्यात आले होते.


यासंदर्भातील आदेशांच्या प्रती एडीजीपी सिक्युरिटीने विशेष डीजीपी राज्य सशस्त्र पोलिस, कमांडंट जनरल पंजाब होम गार्ड आणि डायरेक्ट सिव्हिल डिफेन्स पंजाब, एडीजीपी एसपीयू, एसओजी, सीडीओ, सर्व रेंजचे आयजीपी यांना पाठवल्या आहेत. या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.