Crime News : बिहारमध्ये (Bihar crime) एका लग्नातून (marriage) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नमंडपात पोहोचण्याआधीच नवरदेवाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. लग्नाच्या वरातीदरम्यानच नवरा मुलगा बेशुद्ध होऊन पडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नवरदेव लग्न मंडपाऐवजी रुग्णालयात पोहोचल्याने आजूबाजूच्या लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवरदेवाच्या वरातीमध्ये काही मुली नाचत असताना झालेल्या वादामुळे तरुणाला रुग्णालयात दाखल करावे लागलं आहे. वरातीमध्ये मुली नाचत असताना काही तरुणांनी वरातीमध्ये घुसत त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न केला. झालं इतक्यात वाद पेटला. नवरदेवाच्या नातेवाईकांनी मुलींची छेड काढणाऱ्या तरुणांना समजवण्याचा प्रयत्न केला. तरीही तरुणांना ऐकले नाही म्हणून नातेवाईकांनी त्यांना इशारा दिला आणि वरातीतून बाहेर जाण्यास सांगितले.


मात्र त्यांनी याला नकार दिला आणि थेट नवरदेवाला खाली उतरवून मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणांनी नवरदेवाला इतकी बेदम मारहाण केली तो बेशुद्धच पडला. घाबरलेल्या नातेवाईकांनी बेशुद्ध नवरदेवाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. अशाप्रकारे लग्नमंडपात पोहोचण्यासाठी निघालेला तरुण थेट रुग्णालयाच्या बेडवर जाऊन पोहोचला.


आरा जिल्ह्याच्या उदवंतनगरच्या खालिसा गावातील रणधीर पासवान यांचा 21 वर्षांचा मुलगा अमन कुमार पासवान याचा विवाह जोगाता गावातील सत्येंद्र पासवान यांची मुलीसोबत होणार होता. लग्नासाठी सगळे निघाले होते. त्यावेळी वरातीमध्ये नाचणाऱ्या मुलींची काही तरुणांनी छेड काढण्यास सुरुवात केला. अमन कुमारच्या नातेवाईकांनी याला विरोध केला असता तरुणांनी त्यालाच मारहाण केली. आरोपी तरुणांनी अमनला रथातून खाली खेचले आणि त्याला जबर मारहाण केली. यानंतर नातेवांईकांनी संतत्प होत याचा विरोध सुरु केला. प्रकरण वाढत असल्याचे पाहून तरुणांनी तिथून पळ काढला.


या हाणामारीत नवरदेव अमन कुमार बेशुद्ध पडला. त्याला नातेवाईकांनी तात्काळ जवळच्या आरा रुग्णालयात दाखल केले. मुलीच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनीही आरा रुग्णालय गाठले. मुलीच्या कुटुंबीयांनी अमन कुमारला लग्नासाठी येण्यास सांगितले. मात्र अमनची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत त्याच्या कुटुंबीयांनी वरात काढण्यास नकार दिला. त्यानंतर रुग्णालयातही दोन्ही बाजूंनी वातावरण तापलं होतं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी  नवरदेवाच्या कुटुंबीयांची समजूत घातली आणि वरात काढली. तसेच लग्नानंतर आरोपींवर कारवाई करण्यात येईल, असेही आश्वासनही दिले.


गावातल्या मुलांनीच केली मारहाण


नवरदेवाच्या काकीने यासंदर्भात तक्रार केली आहे.  गावातील पप्पू यादव नावाच्या तरुणाने आणि त्याच्या इतर साथीदाराने वरातीत नाचणाऱ्या मुलीचा विनयभंग केला आहे. मुलीने विरोध केला म्हणून तिची ओढणी ओढली आणि नवरदेवाला मारहाण केली, असा आरोप वराच्या काकीने केला आहे.